सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:42 IST2017-11-04T00:40:39+5:302017-11-04T00:42:34+5:30
काँग्रेसने राज्यभरात जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सध्याचे सरकार हे असंवेदनशील असून, शेतकर्यांसह सर्वसामान्यांना दिलासादायक असे काम या सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेले नाही. त्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे, मेळाव्याचे समन्वयक श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड,जि.प. सदस्य अँड. जयश्री शेळके, माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, शैलेश सावजी, लक्ष्मणराव घुमरे उपस्थित होते. कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने झाले, तरी प्रत्यक्षात शेतकर्यांना कुठलाही दिलासा नाही. अधिवेशना पर्यंत शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पाडू, असे ठाकरे यावेळी म्हणाले. कीटकनाशकामुळे शेतकर्यांचा मृ त्यू झाल्याप्रकरणी मूळ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा असल्याचे ते म्हणाले. सोबतच संबंधित वरिष्ठ अधिकार्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे ते म्हणाले. वर्तमानात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. वादग्रस्त राणी पद्मावती चित्रपटात वास्तव चित्रण असावे, जन तेच्या भावनांचा विचार करता वादग्रस्त सीन काढून टाकावे, असेही ते म्हणाले.
अधिवेशनावर काँग्रेसची दिंडी
अधिवेशनादरम्यान काँग्रेस मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गे अधिवेशनावर दिंडी काढणार आहे. २६ किंवा २७ नोव्हेंबरदरम्यान या दिंडीस प्रारंभ होणार असल्याचे संकेत माणिकराव ठाकरे यांनी दिले. याची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे ती लवकरच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.