लेक शिंदेसेनेकडून झेडपीच्या मैदानात, बापाचा उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:38 IST2026-01-21T18:36:37+5:302026-01-21T18:38:17+5:30
गेल्या ४० वर्षांपासून राजेंद्र राठोड हे शिवसेना पक्षात सक्रिय आहेत. पक्षफुटीच्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

लेक शिंदेसेनेकडून झेडपीच्या मैदानात, बापाचा उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा!
सोयगाव (छत्रपती संभाजीनगर): जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयगाव तालुक्यात एक अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडी समोर आली आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली अनिल पवार यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, राठोड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ४० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्याला आपल्याच कुटुंबातील वैचारिक मतभेदामुळे पदाचा त्याग करावा लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
निष्ठेचा ४० वर्षांचा प्रवास थांबला
राजेंद्र राठोड हे शिवसेनेचे जुने जाणते आणि निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. पक्षफुटीच्या काळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. त्यांची हीच निष्ठा पाहून पक्षाने त्यांच्यावर सोयगाव, सिल्लोड आणि कन्नड या तीन महत्त्वाच्या तालुक्यांच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी आमखेडा गटातून त्यांच्या मुलीने, मोनाली पवार यांनी थेट शिंदेसेनेची उमेदवारी घेत 'धनुष्यबाण' हाती घेतल्याने राठोड यांची मोठी कोंडी झाली.
नैतिकतेचा मोठा निर्णय
घरातील व्यक्तीच विरोधी गटात गेल्यामुळे पक्षाला जाब देणे कठीण होईल, हे ओळखून राजेंद्र राठोड यांनी 'नैतिकता' जपण्याचा निर्णय घेतला. दुपारी १ वाजता त्यांनी आपला राजीनामा अंबादास दानवे यांच्याकडे सुपूर्द केला. "ज्या पक्षाचा मी जिल्हाप्रमुख आहे, त्याच पक्षाच्या विरोधात माझ्या मुलीने उमेदवारी अर्ज भरल्याने मी या पदावर राहणे योग्य नाही," अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
उद्धवसेनेची कोंडी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन तालुक्यांची जबाबदारी असणाऱ्या जिल्हाप्रमुखाने राजीनामा दिल्याने उद्धवसेनेसमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे ठाकले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या उलथापालथीमुळे सोयगावमधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. आता राठोड यांची पुढची भूमिका काय असेल आणि या राजीनाम्याचा फटका निवडणुकीत कोणाला बसेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.