वादळी पावसाचा ३०० एकरातील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:08 IST2018-02-13T00:08:26+5:302018-02-13T00:08:46+5:30
जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.

वादळी पावसाचा ३०० एकरातील पिकांना फटका
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा रब्बी पिके आणि फळाबागांना सर्वाधिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार वादळी पावसामुळे तिनशे एकरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे. सर्वेक्षणानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने रविवारी (दि.१२) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके आणि फळाबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा, गहू या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पावसाअभावी मागील खरीप हंगामात शेतकºयांना हाती आलेले पिके गमावावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरीपात झालेले नुकसान रब्बी पिकाची लागवड करुन भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसाचा गहू, हरभरा, धान या पिकांना फटका बसल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेल्या. वादळी पावसामुळे शेतातील गव्हाचे पीक झोपून गेले. जिल्ह्यात यंदा २४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात गहू, धान, लाखोळी, हरभरा, मक्का या पिकांचा समावेश आहे. तीनशे ते चारशे एकरवर पपई, अॅपल बोर यांच्या फळबागा आहेत. वादळी पावसामुळे फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तिनशे एकरातील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली. राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी कृृषी विभागाला वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कृषी विभागाने सोमवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. आठवडाभरात नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
९६ घरांची पडझड
जिल्ह्यात रविवारी (दि.१२) झालेल्या वादळी-पावसामुळे ९६ घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे व घरावरील टिनाचे छप्पर उडाल्याची माहिती आहे. जिल्हा आपत्तीनिवारण विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.