चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 17:20 IST2018-12-18T17:14:08+5:302018-12-18T17:20:24+5:30
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुंबई - उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईसहमहाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये प्रदेश,राज्यस्थान,छत्तीसगड या राज्यांत भाजपाची झालेली पिछेहाट म्हणजे भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. आझाद यांना ऐकण्यासाठी राज्यातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने मुंबईतील सभेला येईल असा दावा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील त्या घटनेमुळे तेथील योगी सरकारने त्याच्यावर अन्यायकारक रासुका कायद्यानूसार कारवाही केली. सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून दीड महिनाभरापूर्वी सहारनपुर कारागृहातून मुक्तता झाली. मात्र आझाद हे कारागृहात असतानाच आता देशातील दलित बहुजनांचा आक्रमक नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील तरुण या संघटनेकडेआकृष्ट झाला आणि भीम आर्मी मागील दीड वर्षात देशभरात वाढली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भाजपाला सत्तेतून बाहेर करण्याची घोषणा आझाद यांनी केली होती. त्यानुसार दिल्ली, बिजनौर पाटणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानात आझाद यांनी घेतलेल्या सभेला लाखोंचा जनसागर लोटला होता . आझाद यांच्या या सभेनंतर सदर देशातील राजकीय गणिते बदलली जाणार आहेत असे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सांगितले.
देशातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या पार्श्वभूमीवर अॅड. आझाद येत्या 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात 29 डिसेंबर रोजी मुंबईत दादर चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शनिवारी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता वरळी जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या जाहीर सभेला विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गत वर्षी भीमा कोरेगाव दंगलींनंतर झालेल्या बंद दरम्यान अटक झालेल्या भीमसैनिकांसह त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या वकिलांचा या सभेत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे महासचिव सुनिलभाऊ थोरात आणि मुंबईतील सभेचे संयोजक मुंबई प्रमुख सुनीलभाऊ गायकवाड यांनी दिली.
दादर रेल्वे स्थानकास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे ही विविध दलित संघटनासह भीम आर्मीची मागणी आहे. हे राज्य शासनाला काहीच अवघड नाही पण राज्यातील फडणवीस सरकार याकडे जाणीव पुर्वक आमच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप भीम आर्मीने या पत्रकार परीषदेत केला.
भीमा कोरेगाव येथील दंगलीस कारणीभूत असलेल्या मनोहर भिडे आपल्यावरील आरोपाचे खंडन करण्याकरीता वयाचे कारण पुढे करीत कोर्टात हजर राहू शकत नाही. तर मग लालबाग येशील जाहीर सभेला परवानगी नाकारल्या नंतरही हा भिडे शिवडी येथील पालिकेच्या शाळेत गुप्तपणे आयोजित केलेल्या सभेत धारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास कसा काय उपस्थित राहतो. त्यामुळे जाणीवपूर्वक बारादेवी येथील महानगरपालिका शाळेत कार्यक्रमाला परवानगी देणारे महानगरपालिका सहाय्यक पालिका आयुक्त, शाळा मुख्याध्यापक यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावे शिवाय हा कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक व स्वतः संभाजी भिडे यांच्याविरुद्ध विनापरवाना सभा घेणे. सामाजिक सलोखा बिघडविणे, नाशिक न्यायालयाची दिशाभूल करणे, मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास बिघडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी भीम आर्मीने यावेळी केली. सदर कार्यक्रमाला परवानगी नसतानाही 100/150 धारक-यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. तसेच या विनापरवाना कार्यक्रमाला 250 ते 300 पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याचा अर्थ पोलीस प्रशासनाची भिडे यांना साथ होती असाच याचा अर्थ निघतो त्यामुळे पोलीसांच्या या भूमिकेची आणि त्यांच्यावर कोणी दबाव टाकला हे समोर आले पाहीजे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीने केली.
मुंबईतील कार्यक्रमानंतर 30 डिसेंबर रोजी आझाद यांची जाहीर सभा पुण्यात भीमा कोरेगाव क्रांती सभा ते संबोधित करणार आहेत. तर 31 डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव येथील विजयीस्तंभाला अभिवादन करणार आहेत. लातूर येथे 2 जानेवारी 2019 रोजी तर अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर 4 जानेवारी 2019 रोजी अशा सलग चार सभा घेण्यात येणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रमुख कांबळे यांनी दिली.