बांगलादेशींना दिलेल्या जन्म प्रमाणपत्रप्रकरणी फौजदारी कारवाई करा; महापौर तावडेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 06:27 IST2026-02-14T06:27:10+5:302026-02-14T06:27:37+5:30
अवैधरीत्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी तसेच विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार तावडे यांनी पदभार स्वीकारताना केलेल्या भाषणात व्यक्त केला होता

बांगलादेशींना दिलेल्या जन्म प्रमाणपत्रप्रकरणी फौजदारी कारवाई करा; महापौर तावडेंचे आदेश
मुंबई - मुंबईमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्म प्रमाणपत्र आरोग्य विभागाने एक महिन्याच्या आत ताब्यात घ्यावी, तसेच ही प्रमाणपत्रे देणाऱ्या संबंधित डॉक्टर व संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.
अवैधरीत्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी तसेच विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार तावडे यांनी पदभार स्वीकारताना केलेल्या भाषणात व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी उप महापौर संजय घाडी, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच संबंधित तहसीलदार, परवाना विभागाचे व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी २३७ प्रमाणपत्र पोर्टलवर रद्द करण्यात आल्याची माहिती उघडे यांनी दिली. आतापर्यंत ८ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. उर्वरितांवर सोमवारपासून कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या आणि त्यामध्ये परदेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे स्थानिक फेरीवाल्यांवरील आर्थिक ताण आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे तावडे म्हणाल्या.
कागदपत्रे, ओळखपत्रांची तपासणी करा
प्रलंबित प्रकरणात २१ दिवसांनंतर जन्मप्रमाणपत्र वितरण करण्यात आली असून त्यांची फेर चौकशी करावी. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून इतरांवर कारवाई करा. त्याचबरोबर १ जानेवारी २०१६ नंतरचे संपूर्ण दस्तऐवज तपासण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
शहरातील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करावी, फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांची आधार कार्ड इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करkवी, ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आदी सूचना महापौरांनी केल्या.