ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 13:34 IST2019-04-01T13:33:40+5:302019-04-01T13:34:34+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड मतदारसंघातून लढवणार असल्याने डाव्या पक्षांचा तीळपापड झाला आहे.

ही तर 'पप्पू स्ट्राइक'; वायनाडवरून डाव्यांचा राहुल गांधींना टोला
तिरुवनंतरपुरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवणार आहेत. ते पारंपरिक अमेठी मतदारसंघासोबतच दक्षिणेतील केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र काँगेसच्या हा निर्णय केरळमध्ये वर्चस्व असलेल्या डाव्या पक्षांना फारसा रुचलेला नाही. काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तसे सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे 'पप्पू स्ट्राइक' असल्याचे म्हटले आहे.
केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ डावे नेते पी. विजयन यांनीही राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. '' राहुल गांधी हे केरळमधील 20 पैकी एका जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्याविरोधात लढणार आहोत. राहुल गांधी यांना दोन ठिकाणांहून लढायचे होते तर त्यांनी जिथे विरोधात भाजपाचा उमेदवार असेल, अशा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे होती. काँग्रेसने आज घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुकारलेला थेट लढा आहे.''असे विजयन म्हणाले होते. तसेच प्रकाश करात यांनीही काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली होती.
दरम्यान, आज सीपीएमच्या मुखपत्रातूनही काँग्रेसच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. ''राहुल गांधींचा वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय म्हणजे पप्पू स्ट्राइक आहे. केरळ सोडून संपूर्ण भारतात काँग्रेसची सीपीएमसोबत आघाडी आहे.'' असे सीपीएमचे मुखपत्र देशाभिमानी या वृत्तपत्राने म्हटले आहे.