'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:42 IST2026-01-21T18:39:48+5:302026-01-21T18:42:25+5:30
Air Chief Marshal AP Singh: 'सक्षम सेना नसेल, तर कोणीही हल्ला करू शकतो. व्हेनेझुएला आणि इराक अलीकडची उदाहरणे आहेत.'

'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा
Air Chief Marshal AP Singh: भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बुधवारी (21 जानेवारी 2026) बदलत्या जागतिक परिस्थितीत युद्धाच्या नव्या स्वरूपावर आपली भूमिका मांडली. भारतीय वायुसेनेची वाढती क्षमता आणि अलीकडील ऑपरेशन्समधील भारताच्या यशाचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशाराही दिला.
काही तासांत शत्रूला गुडघ्यावर आणण्याची क्षमता
वायुसेना प्रमुख म्हणाले, युद्धग्रस्त भागांतून नागरिकांची सुटका करणे, जसे आम्ही सुदानमध्ये केले किंवा दहशतवादी पायाभूत सुविधा आणि दहशतवाद्यांवर अचूक हल्ले करणे, भारतीय वायुसेनेने सर्व ठिकाणी आपली क्षमता सिद्ध केली आहे. पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर आम्ही काही तासांतच हल्ले करून त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. हीच वायुसेनेची ताकद आहे.
केवळ आर्थिक शक्ती पुरेशी नाही
राष्ट्रीय सुरक्षेसाठी सैन्यशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना एअर चीफ मार्शल सिंह म्हणाले, एखाद्या देशाची सार्वभौमता जपण्यासाठी फक्त आर्थिक बळ पुरेसे नसते. सैन्यशक्ती हेच राष्ट्रीय शक्तीचे अंतिम मोजमाप आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही देश सुरक्षित राहीलच असे नाही. इतिहासाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, एक काळ असा होता, जेव्हा भारत आणि चीन मिळून जागतिक GDP च्या सुमारे 60 टक्के भागावर नियंत्रण ठेवत होते. तरीही आपल्यावर आक्रमण झाले.
मजबूत सेना का आवश्यक?
मजबूत सेनेची गरज स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटले, प्रत्येक देशाकडे सक्षम सेना असणे आवश्यक आहे. ती नसेल तर कोणीही हल्ला करू शकतो. व्हेनेझुएला आणि इराक ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. त्याचबरोबर, सैन्यशक्तीचा वापर करण्याची इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. इच्छाशक्ती नसेल तर संयम दाखवला तरी तो दुर्बलता समजला जातो. मात्र, जेव्हा तुम्ही बलवान असता आणि तरीही संयम बाळगता, तेव्हा तो सामर्थ्याचा संकेत ठरतो, असेही ते म्हणाले.