आठव्या चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रिंगण’ आणि ‘बापजन्म’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:57 IST2018-02-24T18:57:05+5:302018-02-24T18:57:05+5:30
मराठी चित्रपट परिवार आणि सहाया इव्हेट्सतर्फे आयोजित ८ व्या चित्र पदार्पण पुरस्कारामध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ आणि मकरंद माने दिग्दर्शित ‘ रिंगण’ या चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांमध्ये पारितोषिके मिळवित पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.

आठव्या चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रिंगण’ आणि ‘बापजन्म’ची बाजी
पुणे : मराठी चित्रपट परिवार आणि सहाया इव्हेट्सतर्फे आयोजित ८ व्या चित्र पदार्पण पुरस्कारामध्ये निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ आणि मकरंद माने दिग्दर्शित ‘ रिंगण’ या चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटासह विविध विभागांमध्ये पारितोषिके मिळवित पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
या कार्यक्रमात आॅस्कर अॅकॅडमीचे सदस्य उज्वल निरगुडकर,चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फिल्म फेडरेशनचे आॅफ इंडियाचे संचालक विकास पाटील, निर्माते अनिल काकडे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, सुजय डहाके, लेखक श्रीनिवास भणगे ज्येष्ठ चित्रकार रविमुकुल, दिग्दर्शक मनोज कदम, प्रसाद नामजोशी, गीतकार वैभव जोशी, संगीतकार अजय नाईक, निर्मात्या भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
'बापजन्म' चित्रपटासाठी निपुण धर्माधिकारी आणि 'मुरांबा' चित्रपटासाठी वरुण नार्वेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. ती सध्या काय करते या चित्रपटातील अभिनय बेर्डे आणि घुमा चित्रपटासाठी शरद जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस विभागून देण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान ती सध्या काय करते मधील आर्या आंबेकर आणि भिकारी चित्रपटातील ऋचा इनामदार यांनी पटकाविला.
बापजन्म चित्रपटातील भूमिकेसाठी पुष्कराज चिरपुटकर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता ठरला. तर बघतोस काय मुजरा कर चित्रपटासाठी रसिका सुनील आणि ती सध्या काय करते चित्रपटासाठी र्ईशा फडके यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. घाट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा, मुरांबा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा, घुमा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संवादाची पारितोषिके मिळाली. ती सद्या काय करते चित्रपटासाठी मंदार फडके यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार तर बापजन्म चित्रपटासाठी जयदीप वैद्य आणि दिप्ती माटे यांनी सर्वोत्कृष्ट गायक आणि गायिकेचा मान मिळविला. अदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.