भाजीपाला दूधकोंडी

By admin | Published: June 3, 2017 03:04 AM2017-06-03T03:04:29+5:302017-06-03T03:04:29+5:30

शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून

Vegetable milkkondi | भाजीपाला दूधकोंडी

भाजीपाला दूधकोंडी

Next

शेतकरी संपामुळे पिशवीबंद दूध पुरवठा निम्म्याने घटल्याने शहरात शुक्रवारी दूधकोंडीची स्थिती निर्माण झाली. शनिवारपासून दूध टंचाईची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज शहरातील प्रमुख दूध वितरकांनी व्यक्त केला. भाजीपाल्याची आवकही मंदावली असून शनिवारी घाऊक बाजार बंद असल्याने शहरात मोठी टंचाई जाणवण्याची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणच्या आंदोलनामुळे दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. या शिवाय काही महत्त्वाच्या पिशवीबंद दूध कंपन्यांकडून देखील दुधाचा पुरवठा शुक्रवारी कमी झाला. परिणामी ४० ते ५० टक्के दूधपुरवठा घटला. शहरात साधारण दररोज १५ लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. नगर, शिरूर, जुन्नर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि शहर हद्दीलगतच्या गावांमधून संकलित केलेले दूध येथे प्रामुख्याने येते. त्यात जवळपास दहा लाख लिटर दूध पिशवीबंद येते. तर, सुमारे
५ लाख लिटर दुधाचा पुरवठा हा गवळ्यांमार्फत होतो. गवळी या संपात सहभागी नसल्याने काहीसा दूध पुरवठा सुरळीत आहे. पिशवीबंद दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज) व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले, कात्रज डेअरीत दररोज २ लाख २५ हजार लिटर दुधाची आवक होते. शुक्रवारी केवळ १ लाख ३५ हजार लिटर दूध आले. डेअरीमध्ये जवळपास २ लाख लिटर दुधाचा साठा असतो. त्यामुळे शुक्रवारी फारसा परिणाम जाणवला नाही. शनिवारपासून त्याची तीव्रता वाढेल. त्यामुळे संपकाळात दुधाचे इतर उपपदार्थ न करता केवळ दूध वितरण करण्यात येईल. या शिवाय कात्रज डेअरीतील एक वितरण केंद्र २४ तास सुरू ठेवण्यात येईल. शहरात दररोज १५ लाख लिटर दुधाची आवक होते. त्यातील दहा लाख लिटर दूध विविध कंपन्यांमार्फत वितरीत होते. गवळ्यांमार्फत वितरीत होणाऱ्या दुधावर फारसा परिणाम झाला नसल्याचे क्षीरसागर म्हणाले. गणेशपेठ दूध-खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे म्हणाले, मावळ, मुळशी आणि वेल्हा भागातून दूध आले नाही. शहर हद्दीलगतच्या १५-२० किलोमीटर हद्दीतील दूध शुक्रवारी आले. त्यामुळे दररोजचे दूध संकलन ८ हजार लिटरवरून ३ हजार लिटरपर्यंत खाली घसरले होते. परिणामी दुधाच्या दरात प्रतिलिटर ६० वरून ७० रुपयांपर्यंत वाढ झाली.

शेतकरी संपाचा फटका शहराला बसू लागला असून शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी मोठा तुटवडा जाणवू लागल्याने सर्वच भाज्यांचे भाव कडाडले. त्यातच शनिवारी बाजार बंद असल्याने पुणेकरांवर भाज्यांसाठी वणवण फिरणे भाग पडणार आहे. तसेच भाजी मिळाल्यास त्यासाठी खिसा रिकामा करण्याची तयारीही ठेवावी लागणार आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातून शहराची भाज्यांची भूक भागविली जाते. शहरालगतही बाजार असून उपनगरांमध्ये तिथून किरकोळ विक्रेत्यांमार्फत भाजीखरेदी केली जाते. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे सर्वच बाजार ओस पडू लागले आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारात भाजीपालाच आणला जात नसल्याने बहुतेक भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारी केवळ १३ टक्के शेतमालाची आवक झाली. सर्वसाधारपणे दररोज बाजारात ४० हजार ५१० क्विंटल फळे व भाजीपाल्याची आवक होत असते. शुक्रवारी हे प्रमाण केवळ ५ हजार ३६१ क्विंटल होते. भुसार बाजारातील आवकही ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर फुलबाजारात केवळ २३ टक्के फुलांची आवक झाली. यासह पिंपरी बाजार, मोशी बाजार, उत्तमनगर, खडकी आणि मांजरी उपबाजार या सर्व घाऊक बाजारांमध्ये शुक्रवारी केवळ २२ टक्के शेतमालाची आवक झाल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले.
घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे भाव कडाडले आहेत. शुक्रवारी मागणीच्या तुलनेत आवक खूपच कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही चढ्या भावाने खरेदी करावी लागली. तसेच सर्व विक्रत्यांनाही भाजी मिळू शकली नाही. त्यातच शनिवारी मार्केट यार्ड साप्ताहिक सुटीमुळे बंद राहणार असल्याने काही प्रमाणात होणारी आवकही पूर्णपणे थांबणार आहे. परिणामी शनिवारपासूनच शहरात भाज्यांसाठी वणवण फिरण्याची वेळ पुणेकरांवर येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांकडून थेट विक्री
शेतकरी संपामुळे घाऊक बाजारात थेट माल विक्रीसाठी आणता येत नसल्याने काही शेतकऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना थेट विक्री केली जात असल्याचे दिसून आले. शुक्रवारी मार्केट यार्डातील बाजार बंद असल्याने शेतकरी किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधून विचारणा करीत आहेत. विके्रत्यांना
थेट शेतातून माल घेऊन जाण्याची विनंती करीत आहेत. मात्र, नुकसानीच्या भीतीने विक्रेत्यांकडून त्याला नकार दिला जात आहे. तर काही शेतकरी वाहनामध्ये माल पूर्णपणे झाकून विक्रीसाठी आणत आहेत.


फळ, फुलबाजारालाही फटका

भाजीपाल्याप्रमाणेच संपाचा फटका फळे व फुलांनाही बसला आहे. मार्केट यार्डातील फळबाजार व फुलबाजारात या मालाची आवक केवळ २० ते २५ टक्के एवढीच झाली. त्यामुळे फळे व फुलांचे भावही वाढले आहेत. फुलबाजारात फुलांची आवक केवळ २३ टक्के एवढीच झाली. तर फळबाजारात हे प्रमाणात १० ते १५ टक्क्यांच्या जवळपास होते. हापूस आंब्याचा हंगाम संपत आल्याने त्यावर फारसा परिणाम झालेला नाही. तर लिंबाची आवक नियमित आवकपेक्षा निम्म्याहून कमी झाल्याने भाव दुपटीने वाढले. इतर फळांची आवकही रोडावली आहे.

दर शुक्रवारी साधारण १०० ते १२० गाड्या शेतमालाची आवक होत असते. पण संपामुळे ही आवक १० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे भाज्यांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. काही किरकोळ विक्रेत्यांनाही भाज्या मिळाल्या नाही. त्यामुळे काहींनी विक्री बंद ठेवली आहे. शनिवारी सुट्टी असल्याने मोठा तुटवडा जाणवेल.- विलास भुजबळ, ज्येष्ठ व्यापारी, मार्केट यार्ड


फळभाज्यांचे घाऊक बाजारातील
दहा किलोचे भाव :

भाजीदि. २८ मेदि. २ जून
कांदा :५०-७०९०-११०
बटाटा : ६०-१००८०-१३०
भेंडी :२००-३०० ३००-५००
गवार : २००-३००५००-७००
टोमॅटो : १००-१२० ३००
दोडका : ३००-४०० ५००
हिरवी मिरची : ४००-५०० ५००
फ्लॉवर : ८०-१२० ३००
कोबी : १००-१५० ४००
वांगी : १५०-२५० ३००-६००
ढोबळी मिरची : २६०-३०० ७००-१०००
घेवडा : ८००-१००० १५००
सर्व पालेभाज्या५००-१५००२०००-२५००


किरकोळ बाजारातील भाव

भाज्यामहात्मा फुले मंडई
कांदा२०
फ्लॉवर४०
भेंडी८०
वांगी७०
दुधी भोपळा४०
टोमॅटो ४०
कोबी ५०
काकडी ३०
ढोबळी मिरची ८०
घेवडा १६०
गवार ७०
शेवगा ६०
मेथी (जुडी) २०
पालक १५
कोथिंबीर ३०

Web Title: Vegetable milkkondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.