३० दिवसांपासून सराफा बाजार बंदच; दीड अब्जची उलाढाल ठप्प !
By Admin | Published: March 31, 2016 12:19 AM2016-03-31T00:19:11+5:302016-03-31T00:31:13+5:30
लातूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सराफांवर अबकारी कर प्रस्तावित करुन तो लागू केला आहे़ अबकारी करासह जाचक अटी रद्द कराव्यात,
लातूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सराफांवर अबकारी कर प्रस्तावित करुन तो लागू केला आहे़ अबकारी करासह जाचक अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी लातूर जिल्हा सुवर्णकार सराफा असोशिएशनने गेल्या ३० दिवसांपासून सराफा बाजार बंद ठेऊन निषेध नोंदविला आहे़ परंतु, केंद्र शासन कोणतीही पाऊले उचलत नसल्याने या आंदोलनाचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसत आहे़ सध्या लग्नसराई सुरु असून ग्रॅमभर सोनेही मिळेनासे झाल्याने ग्राहकांची धावाधाव सुरु आहे़ जिल्ह्यातील १ अब्ज ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल ठप्प झाली आहे़
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकाने अबकारी कर प्रस्तावित करुन काही जाचक अटी लागू केल्या आहेत़ अबकारी कर रद्द करावा, तसेच जाचक अटीही शिथील कराव्यात या मागणीसाठी लातूर जिल्हा सुवर्णकार सराफा असोशिएशनने जिल्ह्यात १ मार्चपासून बेमुदत बाजारपेठ बंद आंदोलन सुरु केले आहे़ जिल्ह्यात ११८० सराफा दुकाने असून ६० हजार कामगार आहेत़ गेल्या ३० दिवसांपासून हे आंदोलन सुरु असतानाही सरकारकडून कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ग्राहकच अडचणीत सापडले आहेत़
लातूर जिल्ह्यात दररोज जवळपास ५ कोटींपेक्षा जास्त सोने- चांदीतून उलाढाल असते़ सध्या दुष्काळी परिस्थिती आहे़ त्याचबरोबर यंदाच्या उन्हाळ्यात लग्नतिथी कमी आहेत़ त्यामुळे विवाह जमलेल्यांची शुभकार्य उरकरण्यासाठी धावपळ सुरु आहे़ विवाह समारंभासह अन्य कार्यांसाठी अनेकजण सोने खरेदी करीत असतात़ परंतु, सराफा बाजारच बंद असल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत़ अनेकदा हेलपाटे मारुही ग्रॅमभरही सोने मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे़ शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी लातूर जिल्हा सुवर्णकार सराफा असोशिएशनच्या वतीने पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ त्यानंतर चर्चासत्र घेण्यात आले़ तसेच रस्ता स्वच्छ करण्याचे आंदोलन केले़ मात्र, अद्यापही सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही़ सरकार धोरणाच्या त्रांगड्यात सराफा व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकही अडकले आहेत़ परिणामी, १ अब्ज ५० कोटींची जिल्ह्यातील उलाढाल ठप्प झाली आहे़