काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा !

By admin | Published: March 7, 2016 04:12 PM2016-03-07T16:12:43+5:302016-03-07T16:12:43+5:30

काँग्रेसच्या अधिकृत सोशल मिडियावर हुतात्मा चंद्रशेखर आझाद व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन थोर क्रांतिकारक राष्ट्रभक्तांची तुलना करून या पक्षाने आपल्या नीच मनोवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले

Congress's unforgivable falsehood! | काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा !

काँग्रेसचा अक्षम्य खोटारडेपणा !

Next
>भारतकुमार राऊत
काँग्रेसच्या अधिकृत सोशल मिडियावर हुतात्मा चंद्रशेखर आझाद व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन थोर क्रांतिकारक राष्ट्रभक्तांची तुलना करून या पक्षाने आपल्या नीच मनोवृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. ते किळसवाणेच आहे. वास्तविक चंद्रशेखर आझाद व सावरकर या दोघांच्याही प्रखर राष्ट्रभक्ती व त्यागासमोर सर्वांनी नतमस्मकच व्हायला हवे. पण प्रत्येक संधीवर आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेण्याची विकृती जडलेल्या काँग्रेसने आजही आपण सुधारणेपलिकडचे आहोत, हेच पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. 
मध्यान्हीच्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कुणीही केला, तरी त्याची थुंकी त्याच्याच तोंडावर पडते, तसेच या ट्वीटमुळे काँग्रेसचे झाले आहे. अर्थात ज्यांनी स्वत:हूनच स्वत:च्या तोंडाला काळे फासून घेण्यात धन्यता मानली, त्यांना आपला चेहरा आपल्याच थुंकीने बरबटला, तरी त्याचे काय वैषम्य! चंद्रशेखर आझाद यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले. त्यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल त्यांना त्रिवार मुजरा करायलाच हवा. पण तसे करताना वीर सावरकरांनी `ब्रिटिशांकडे वारंवार दयेची भीक मागितली', असा खोटा प्रचार कशासाठी? 
अर्धसत्य हे अनेकदा पूर्ण असत्यापेक्षा अधिक घातक असते. काँग्रेसने याच शस्त्राचा प्रयोग त्यागी राष्ट्रपुरुषांची प्रतिमा मलीन करण्यासाठी वापरण्याचे योजलेले दिसते. इतिहासाची मोडतोड करून व त्यातील काही भागच संदर्भाशिवाय सादर केल्याने आपण राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांबद्दलची आदराची भावना नष्ट करू, असे काँग्रेसला नेहमीच वाटत आले आहे. विशेषत: स्वांतत्र्यवीरांसारख्या सशस्त्र क्रांतिकारकांबाबत काँग्रेसचे हेच धोरण राहिले आहे. त्यामुळेच अंदमानच्या सेलुलर तुरुंगामध्ये लावण्यात आलेल्या सावरकरांच्या राष्ट्रभक्तीपर काव्यपंक्ती काढून टाकण्याचे पापकर्म तेव्हाचे केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी काय केले. परिणाम काय झाला? त्यापुढच्या दोन लोकसभा निवडणुकांत अय्यरना त्यांच्याच मतदारसंघात दारुण पराभव स्वीकारावा लागला.
सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दयेची भीक मागितली, असे म्हणणे धादान्त खोटे व दिशाभूल करणारे आहे. त्यांनी स्वत:च्या व अन्य राजकीय बंदिवानांच्या सुटकेची मागणी करणारी पत्रे ब्रिटिश सरकारला लिहिली. पण सुटकेची माग्णी करणे व दयेची भीक मागणे, यामध्ये महद् अंतर आहे, हे कळण्याइतकीही बुद्धी काँग्रेसकडे शिल्लक राहिलेली नाही का? ज्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांना पत्रे लिहिली, त्याच काळात ब्रिटिश सरकारने आयर्लंडमध्ये तिथल्या स्वातंत्र्यसैनिकांची मुक्तता केली होती. त्याच न्यायाने भारतातील सर्व राजकीय बंदिवांनांना मुक्त करावे, असा त्यांचा युक्तिवाद होता.
सावरकर बॅरिस्टर होते. त्यांना ब्रिटिश कायद्यांची उत्तम जाण होती. अशा वेळी त्यांच्या ज्ञानाचा फायदा मिळवून जर भारतीय राजकीय बंदी सुटले असते, तर ते देशहिताचेच ठरले असते. अशा प्रयत्नांना `दयेची भीक मागणे' असे म्हणणे, अज्ञानाचे व कृतघ्नपणाचेही द्योतक आहे.
या सदर्भात काही बाबी सांगायलाच हव्यात:
1. 1931मध्ये झालेल्या गांधी-लॉर्ड आयर्विन कराराच्या वेळी गांधीजींना कारावासाची शिक्षा झालेली होती. या करारात गांधीजींनी देशभर चाललेली सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेण्याचे व दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचे मान्य केले. त्यामुळेच गांधीजी तुरुंगातून मुक्त झाले. याला काय म्हणायचे? ही `दयेची भीक' नव्हती का?
2. चंद्रशेखर आझाद यांना फाशीची सजा झाली, तेव्हा काँग्रेसने कोणता विरोध नोंदवला?
3. भगत सिंह, सुखदेव व राजगुरू या तीन देशभक्त क्रांतिकारक तरुणांना ब्रिटिशांनी फाशी दिले. त्यावेळी काँग्रेस काय करत होती? उलट गांधीजींनी भगत सिंह यांच्या कृत्याचा निषेधच केला होता. याचे समर्थन आज काँग्रेस कसे व कोणत्या शब्दांत करेल?
4. अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला वेढा घालून गावागावांत नासधूस, अत्याचार व जाळपोळ चालवली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला भेटण्याची तयारी दाखवलीच. पण आम्ही आपल्याकडे यायला घाबरतो. आपणच प्रतापगडावर यावे, असा निरोप पाठवला. ही युद्धाची व्यूहरचना होती. यालाही काँग्रेस दयेची भीक मानणार का? 
5. औरंगझेबाच्या फौजा चाल करून आल्या व त्यांनी मराठी मुलुखात हाहाकार माजवला, तेव्हा औरंगझेबाच्या सर्व अटी मान्य करून महाराजांनी आपल्या ताब्यातील बव्हंश गड-किल्ले मोगलांना दिले व ते स्वत: संभाजी महाराजांसह औरंगझेबाच्या दरबारात दाखल झाले. याला आज काँग्रेस काय म्हणणार? दयेची भीक? पुढला इतिहास जगजाहीर आहेच.
6. काँग्रेसने वीर सावरकरांचा उल्लेख `भाजपचे' असा केला आहे. त्यांनी आधी इतिहासाचे किमान वाचन करावे, अशी अपेक्षा आहे. वीर सावरकरांच्या काळात कार्यरत असलेल्या भारतीय जनसंघ वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी त्यांचा कधीही सुसंवाद नव्हता. या मंडळींची ध्येय-धोरणे व कार्यपद्धती सावरकरांना मान्य नव्हती. म्हणूनच त्यांनी स्वत:ची हिंदु महासभा या संघटनेची रचना केली. या संघटनेने तेव्हाच्या जनसंघाविरुद्ध निवडणुकाही लढवल्या होत्या.
7. शेवटी एक स्मरण: काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या इंदिराजी गांधी यांनी मुंबईत उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी स्वत:च्या वैयिक्तक खात्यातून रु. 5 हजारचा चेक तेव्हाचे स्मारकाचे अध्यक्ष कै. जयंतराव टिळक यांच्या स्वाधीन केला होता. इंदिराजींच्या या कृतीबद्दल आताच्या काँग्रेसला काय म्हणायचे आहे?
असो. इतके शहाणपण काँग्रेसला शिकवण्यात हशील नाही. इतकेच सांगावेसे वाटते की, You can fool all people for some time but can't fool all people all the time. सत्य फार काळ दाबून ठेवता येत नाही आणि लोकांना सर्व काळ फसवताही येत नाही.
 
 
Twitter - @BharatkumarRaut

Web Title: Congress's unforgivable falsehood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.