राज्यात वाघांची संख्या वाढली
By admin | Published: July 17, 2016 01:39 AM2016-07-17T01:39:21+5:302016-07-17T01:39:21+5:30
काही दिवसापूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
सुधीर मुनगंटीवार : झाडे वाचवा, आयुष्य वाचवाचा संदेश
नागपूर : काही दिवसापूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यात नागपूर परिक्षेत्रातील ३५० किलोमीटर परिसरात ३५० वाघ आढळून असल्याची माहिती राज्याचे वित्त अणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी दिली. सिव्हिल लाईन येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित अखिल भारतीय उदबत्ती उत्पादक संघातर्फे आयोजित कार्यक्रमाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
वाघामुळे वनसृष्टीचे चक्र कायम आहे. वाघ आहेत तिथे वन आहे तर जिथे वन आहे, तिथे पर्यावरण आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन दिनी २९ जुलै २०१६ रोजी राज्यातील मुख्य कार्यक्रम नागपुरात घेतला जाणार आहे. यावेळी वाघाचे चिन्ह असलेले डाक तिकीट जारी केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पर्यावरण संवर्धनासाठी ‘झाडे वाचवा, आयुष्य वाचवा’असा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. प्रदूषणमुक्त वातावणासाठी वसुंधरायुक्त सृष्टी निर्माण करण्याची गरज असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
प्रारंभी त्यांनी उदबत्ती उत्पादक संघातफें आयोजित प्रदर्शनाचे अवलोकन करून शुभेच्छा दिल्या. या व्यवसायामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याला मदत होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय उदबत्ती संघाचे अध्यक्ष दीपक ठकराल व सचिव आसीफ माकडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)