काजू लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. ओला काजूगर, वाळलेली काजू बी विक्री करणारे बागायतदार भरपूर आहेत.
परंतु, काजू बी प्रक्रियेवर आधारित व्यवसाय काहींनी सुरू केले आहेत. काजू बी मधून काजूगर हाताने किंवा यंत्राच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काढणे, या प्रक्रियेला काजू प्रक्रिया उद्योगात विशेष महत्त्व आहे.
काजू बी भाजणे हीसुद्धा महत्त्वपर्ण बाब आहे. काजू बिया तीन पद्धतीने भाजता येतात. पहिल्या पद्धतीत काजू बी उघड्या सच्छिद्र भांड्यात भाजल्या जातात. या पद्धतीत काजू टरफलातील तेल जळून जाते व काजूगर टोकाकडे काळपट होण्याची भीती असते.
ड्रममध्ये बिया भाजणे
या पद्धतीत काजू बिया लोखंडी ड्रममध्ये (३.५x१.० मीटर व्यास) भाजण्यात येतात. ड्रम सच्छिद्र असून, तिरका बसवलेला असतो. बिया अतिशय गरम तांबड्या लाल इममध्ये भरतात. इम सतत गोलाकार फिरत असतो. काजू टरफल तेल जोरात बाहेर येऊन जळत राहते आणि त्यामध्ये काजू बिया भाजल्या जातात. याकरिता ड्रम ३ ते ४ मिनिटे सतत फिरत ठेवावा लागतो. यानंतर ड्रमच्या खालच्या टोकाकडून भाजलेल्या बिया काढल्या जातात. त्यावर लगेच राख पसरतात, जेणेकरून टरफलावरील गर काढण्याचा वेग, पूर्ण गर मिळण्याचे प्रमाण जास्त, तसेच गराचा दर्जासुद्धा चांगला असतो. या पद्धतीचा दोष म्हणजे काजू टरफल तेलाचे पूर्णपणे होणारे नुकसान तसेच मजुरांना सतत उष्ण वातावरणात काजू तेलाच्या वाफेत राहावे लागते.
टरफल तेलात बिया भाजणे
या पद्धतीत मोठ्या टाकीत काजू टरफल तेल ओतून त्याचे तापमान २०० अंश सेल्सिअसपर्यंत आणले जाते. त्यामध्ये काजू बिया लोखंडी जाळीच्या साहाय्याने दीड मिनिटे बुडतात. टाकी माईल्ड स्टीलच्या पातळ पत्र्यापासून तयार करतात. टाकी चौकोनी असून, तिची रुंदी २ मीटर व खोली एक मीटर असून, विटाच्या भट्टीत व्यवस्थित बसवतात. या पद्धतीमध्ये काजू बी टरफलातील ८० ते ९० टक्के तेल मिळविता येते. बिया समप्रमाणात भाजतात आणि पूर्ण सफेद गरांचे प्रमाण जास्त मिळते. इतर भाजण्याच्या पद्धतीप्रमाणे काजूगर काळपट पडत नाही.
काजू बी वाफवणे
काजूगर काढण्यासाठी भाजण्याबरोबर वाफवण्याचीही पद्धत आहे. वाफवल्यामुळे अन्य पद्धतीपेक्षा गरावर डाग येत नाही. काजू बिया काढणीनंतर ड्राईंग यार्डवर दोन दिवस चांगल्या सुकवाव्यात, त्यानंतर बॉयलरमध्ये बिया घालाव्यात. साधारणतः ३२० किलो बियांच्या क्षमतेच्या बॉयलरमध्ये बिया व्यवस्थित वाफवण्यासाठी पहिल्या लॉटला दोन तास लागतात. या पद्धतीमुळे काजूगराचा तुकडा पडण्याचे प्रमाण १५ टक्के असते. बहुतांश उद्योजक या प्रक्रियेचा अवलंब करतात.
अधिक वाचा: Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर