Holi Festival : होळीचा सण (Holi Festival) म्हंटल की लहानपणी आईवडील हे हारकडे (Har Kade) बाजारातुन आणून देत. हेच हारकडे गळ्यात-हातात घालून मग गावातून चक्कर मारली जाई. खायला गोड असल्याने लहानग्यांकडून सतत मागणी केली जात असायची. हेच हार कडे बनवणारे, नाशिकचे वाडेकर कुटुंबीय. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरात एकत्र कुटुंब पद्धतीने वास्तव्यास आहेत. या कुटुंबाने छोटे छोटे व्यवसाय करत आजमितीला ते हार कड्यांच्या व्यवसायाला मोठी उभारी दिली आहे.
होळी आणि गुढी पाडव्याची (Gudhipadwa) चाहूल लागली, की साखरेच्या गाठ्यांचे हार-कडे बाजारात पाहायला मिळतात. अनेक कुटुंबांमध्ये या गाठी निर्मितीचा व्यवसाय परंपरागतरीत्या चालत आला आहे. आता होळी सण उद्यावर आला असून वाडेकर कुटुंबियांच्या (Wadekar Family) घरी साखरीचे रंगीबेरंगी हारकडे तयार झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांची हि लगबग सुरु असून आतापर्यंत त्यांनी १०० ते १२० क्विंटलचा माल तयार केला आहे.
पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी हे कुटुंब परिसरात प्रसिद्ध आहे. वडिलोपार्जित नव्हे तर गेल्या अनेक पिढ्यांचा हा उद्योग अनेकांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वीरीत्या पुढे चालू ठेवला आहे. या साखरगाठीची रेसिपी साधारण वाटत असली तरी या मागे मोठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात. ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धडपडत का होईना शाबूत असून या कुटुंबाने मेहनतीतून होळी सणाचा गोडवा कायम राखला आहे.
हार-कड्यांचे प्रकार आणि किंमत...
वाडेकर कुटुंब पावशेरापासून ते किलोपर्यंत हार कडे बनवत असते. पूर्वी केवळ एकाच पांढऱ्या कलरमध्ये हार तयार केले जातात. मात्र आता केशरी, लाल, पिवळ्या कलरमध्ये तयार केले जातात. यात लहान हारापासून ते पूजेसाठी लागणारे हार, देवीचे हार बनवले जातात. याची किंमत २० ते ३० रुपयांपासून पुढे आहे.
हार-कडे बनविण्याची कृती
सुरवातीला पंधरा किलो साखरेची चाचणी घेतली जाते. यात दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. या चाचणीत नैसर्गिक रंग मिसळले जातात. यानंतर लाकडी साच्यामध्ये हे ओतले जाते. हे साचे हार कड्यांच्या साईजनुसार तयार करण्यात आले आहेत. यानंतर काही मिनिटात साच्यांमधून हार किंवा कडे हळुवारपणे काढले जातात. चांगले कडे ट्रे मध्ये तर तुकडे झाल्यास बाजूला ठेवले जातात. यानंतर साचे पुन्हा स्वच्छ धुवून घेतले जातात. एका पंधरा किलोच्या चाचणीतून १२ ते १३ किलो माल तयार होत असतो. असा दिवसाला ६० ते ७० किलो माल तयार केला जातो.