Join us

नाशिकच्या कृषि विज्ञान केंद्राची जीवाणू खते तुम्ही वापरलीत का?

By बिभिषण बागल | Published: July 23, 2023 9:10 AM

वातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

फळे, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य व नगदी पिकांच्या उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. खतांची वाढती गरज व किंमती तसेच रासायनिक खतांची जमिनीतील अकार्यक्षमता यांमुळे पीक उत्पादन वाढीच्या खर्चात वाढ होत आहे.

पिकांसाठी उपयुक्त जीवाणू खते:वातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे. अशा जीवाणूंचा जमिनीत यापर वाढविल्यास उत्पादनवाढ व रासायनिक खतांचा मर्यादित वापर होणार आहे.जमीनीतील अन्नद्रव्ये उपलब्धतेसाठी उपयुक्त जीवाणू

  • ॲझोस्पिरीलम लिपोफेरम
  • ॲझोटोबॅक्टर कुकीकम
  • ॲसिटोबॅक्टर डायझोट्रोपिक्स
  • रायझोबियम जॅपोनिकम
  • रायझोबियम लेग्यूमिनासिरम
  • बेसिलस मेगाटेरीयम
  • फ्रैन्च्यूरिया ओरेनेशिया

ॲझोटोबॅक्टरॲझोटोबॅक्टर जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात. हवेमध्ये मुक्त नत्राचे प्रमाण ७८ टक्के असून मुक्त स्वरुपातील नत्रवायू ॲझोटोबॅक्टर जीवाणूमार्फत जमिनीमध्ये शोषला जातो व जमिनीत स्थिर करून पिकास उपलब्ध करून दिला जातो. अझोटोबॅक्टर जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. ॲझोटोबॅक्टर जीवाणू खतांचा वापर द्विदल पिके वगळून इतर सर्व एकदल पिकांना उपयोगी आहे. उदाहरणार्थ- ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल, भाजीपाला व फळपिके इत्यादी.ॲझोटोबॅक्टर जीवाणू खतांच्या चापरामुळे १० से २५ टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन मिळते तसेच १० ते २५ किलो. प्रति हेक्टरी नत्र खताची बचतही होते.झोटोबॅक्टर वापरण्याची पद्धत

  • बीजप्रक्रिया करण्यासाठी २५ मिली जीवाणू खत व ५०० मिली गुळाचे द्रावण प्रती किलो बियाण्यासाठी वापरावे.
  • प्रक्रिया केलेले बियाणे स्वच्छ कापडावर पसरवावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे. रोपांसाठी जीवाणू खत वापरण्यासाठी रोपांची मुळे १०० मिली जीवाणू खत व १० ली. पाणी द्रावणात ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी.
  • पिकांच्या शाखीय वाढीच्या अवस्थेपर्यंत जमिनीतून द्यावयाचे असल्यास सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असावे. साधारणतः २ ली. जीवाणू खत व २०० ली. पाणी असे प्रमाण घेऊन दहा दिवसांच्या अंतराने जमिनीतून द्यावे.

ॲझोस्पिरीलमॲझोस्पिरीलम जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात. ॲझोस्पिरीलम जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती व मुळांमध्ये राहून सह- सहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. हे जीवाणू अधिक कार्यक्षम असून ते ॲझोटोबॅक्टरपेक्षा दुप्पट प्रमाणात हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात, ॲझोस्पिरीलम जीवाणू एकदल, भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. ॲझोस्पिरीलम प्रति वर्ष प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्राचे स्थिरीकरण करतात व पीक उत्पादनात १५ ते २० ने वाढ करतात.झोस्पिरीलम वापरण्याची पद्धत

  • १ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) द्रावण करून वापरावे. बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
  • रोपांची पुनर्लागवड करण्याआधी पाणी (१० लीटर) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी.
  • पिकांच्या शाखीय वाढीपर्यंत २०० ली. पाण्यात २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.

ॲसिटोबॅक्टरॲसिटोबॅक्टर जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात. ॲसिटोबॅक्टर जीवाणू आंतरप्रवाही असून मुळांद्वारे नत्र उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. हे जीवाणू साखर असलेल्या पिकांच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावतात. ॲसिटोबॅक्टर ऊस, रताळे, गोड ज्वारी पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती सह-सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. या जीवाणू खतांमुळे ऊस पिकावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. या जीवाणू खतांद्वारे ऊस पिकाला ४० ते ५० टक्के नत्राचा पुरवठा होऊन उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते. नत्र स्थिरीकरणाव्यतिरिक्त हे जीवाणू इंडॉल अॅसेटीक ॲसिड तयार करत असल्यामुळे पिकांच्या मुळांच्या वाढीसही मदत होते.ॲसिटोबक्टर वापरण्याची पद्धत

  • गोड ज्वारी पिकासाठी १ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे.
  • बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे. रोपांसाठी पाणी (१० ली.) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी.
  • ऊस व रताळे पिकांसाठी पाणी (४० ली.) व जीवाणू (२५० मिली) द्रावणात ऊसाच्या कांड्या बुडवून लागवड करावी.
  • पिकांच्या शाखीय वाढीपर्यंत २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.

रायझोबियमरायझोबियम जीवाणू सहजीवी पद्धतीने वातावरणातील नत्र पिकांच्या मुळांवरील गाठींमध्ये स्थिर करतात. रायझोबियम जीवाणू पिकांना हवेत असलेले नत्र मुळांवरील गाठींमध्ये स्थिर करतात व त्या बदल्यात पिकांकडून खाद्य मिळवतात. रायझोबियम जीवाणू द्विदल पिकांसाठी उपयोगी आहे. रायझोबियम जीवाणूंच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. पिकांनुसार या प्रजातीची निवड करावी लागते.

कोणत्या पिकात रायझोबियम जीवाणूंची प्रजाती वापरावी याचा माहितीचा तक्ता.

जीवाणूंची प्रजातीपिके
रायझोबियम सायसेरीचवळी, तूर, मटकी, उडीद, सोयाबीन
रायझोबियम जापोनिकममूंग, गवार, ताग, धैचा, हरभरा
रायझोबियम लेग्यूमिनोसेरमवाटाणा
रायझोबियम ट्रायफोलीबरसीम
रायझोबियम मेलीलोटीमेथी, लसण
रायझोबियम फँसीओलीघेवड्याचे सर्व प्रकार

रायझोबियम वापरण्याची पद्धत

  • १ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे.
  • बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
  • पिकांच्या शाखीय वाढीपर्यंत २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.

स्फुरद विरघळविणारे जीवाणूनत्राच्याबरोबर स्फुरद हे सुद्धा पिकांचे प्रमुख अन्नद्रव्य आहे. स्फुरदयुक्त रासायनिक खतांद्वारे पुरविलेल्या स्फुरदापैकी बरेचसे स्फुरद जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांमुळे स्थिर होऊन ते पाण्यात न विरघळणाऱ्या घट्ट स्वरूपात सपांतर होते, असे स्फुरद वनस्पतींना उपयुक्त नसते. घट्ट स्वरूपातील स्फुरद विरघळून द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य स्फुरद विरघळविणारे जीवाणू करतात. पाण्यात विरघळणारे द्राव्य स्वरूपातील स्फुरदच पिकांची मुळे शोषण घेऊ शकतात. स्फुरद विरघळविणारे जीवाणू सर्वच पिकांमध्ये उपयोगी आहे. तसेच उपयुक्त असलेले वादवर्धक द्रव्य तयार करण्याचे कार्य हे जीवाणू करतात.स्फुरद विरघळविणारे जीवाणू वापरण्याची पद्धत

  • १ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे.
  • बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
  • रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी पाणी (१० ली.) व जीवाणू (५०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी.
  • पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी २०० लि. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे. 

पालाश विरघळविणारे जीवाणूनत्र, स्फुरद बरोबर पालाश हे अन्नद्रव्य पिकांसाठी प्रमुख अन्नद्रव्यांपैकी एक आहे. जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्याची मुबलकता असूनही तो स्थिर म्हणजेच घट्ट स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाश जैव-रासायनिक क्रियांद्वारे पिकांना उपलब्ध करून देतात. पालाश या अन्नद्रव्यांचे वहन होत नाही, हे जीवाणू पालाशची बहनक्रिया सक्रीय करतात. पालाश विरघळविणारे जीवाणू सर्वच पिकांमध्ये उपयोगी आहे. पालाश विरघळविणाऱ्या जीवाणूंचा पिकातील कीड व रोग प्रतिकार शक्ती तसेच प्रत सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे.पालाश विरघळविणारे जीवाणू वापरण्याची पद्धत

  • १ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे.
  • बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
  • रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी पाणी (१० ली.) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी.
  • पिकांच्या पक्वतेच्या अवस्थेत २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे. 

जीवाणू संवर्धन वाढविण्याची घरगुती पद्धत

  • २० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम घ्यावा. अर्ध्या ड्रममध्ये ताजे शेण, १ किलो गूळ व १ ली. जीवाणू खतांचे मातृवाण टाकावे, त्यानंतर ड्रम पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी टाकावे, ड्रममधील द्रायण काठीने रोज हलवावे, ड्रममध्ये हवा खेळती राहील अशा पद्धतीने गोणपाटाने झाकून सावलीत ठेवावा. सदरचे द्रावण १० दिवस अंबवावे व एकरी २ लीटर द्रावण २०० लीटर पाण्यातून जमिनीतून द्यावे किंवा पिकांवर फवारणी करावी.
  • १ टन कुजलेल्या सेंद्रिय खतांमध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद व पालाश विरघळविणारे प्रत्येकी २ ली. मिसळून लागवडीच्या वेळी वापरावे.
  • या प्रकारे उपयुक्त जीवाणू खतांची वाढ करून शेतात नियमित वापर करावा, त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहतो, पिकांमध्ये रासायनिक खतांच्या मर्यादित वापरामुळे जमीन सजीव राहते व उत्पादन खर्च कमी होतो.

टीप१) जीवाणू खतांसोबत कोणतेही रासायनिक बुरशी व कीटकनाशके एकत्रित मिसळू नये.२) जीवाणू खते वापरल्यानंतर ८ ते १० दिवस कोणतेही रासायनिक बुरशी व कीटकनाशके वापरू नये.श्री. मंगेश व्यवहारेकार्यक्रम सहायक (कृषी)डॉ. नितीन ठोकेवरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुखकृषि विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकदूरध्वनी: ०२५३-२२३०६९८ | E-mail kvknashik@rediffmail.com

टॅग्स :शेतीपीकपीक व्यवस्थापनशेतकरीखते