Join us

गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’ आविष्काराला मिळाले पेटंट, शेतकऱ्यांना काय फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 13:58 IST

"जायफळ टॅफी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले उत्पादन" नावाच्या शोधाला पेटंट प्रदान करण्यात आला आहे.

कृषि क्षेत्रातील महत्वाची बातमी असून गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) मधील डॉ. ए.आर. देसाई आणि त्यांच्या नेतृत्वाखालील चमूच्या "जायफळ टॅफी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले उत्पादन" नावाच्या शोधाला पेटंट प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे या पिकाला नवी ओळख मिळाली आहे. 

जायफळ, भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून त्याची प्रामुख्याने जायफळ बी  आणि गर यासाठी लागवड केली जाते. कापणीनंतर बहुतेक वेळा जायफळाचे बीज कोष शिल्लक राहतात. या शिल्लक उप-उत्पादनाची दखल घेत गोव्यातील आयसीएआर - सीसीएआरआयने जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशानेएक उपाय विकसित केला आहे, जायफळ बीज कोष टॅफी.  या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण पौष्टिक मूल्य असून ते ताज्या फळाच्या 80-85 टक्के भाग बनते  आणि कृत्रिम संरक्षकांशिवाय सामान्य तापमानात 12 महिन्यांपर्यंत सोयीस्करपणे साठवले जाऊ शकते. यामुळे हे उत्पादन एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय बनले आहे.

या नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे, शेतकऱ्यांना पारंपरिक जायफळ मसाल्याच्या उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त प्रत्येक झाडामागे 5 हजार 600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेची साधेपणा, त्यासाठी अगदी थोड्या उपकरणांची आवश्यकता आणि व्यावसायिक व्यवहार्यता या वैशिष्ट्यांमुळे कृषी-उद्योजकता, स्वयं-सहायता गट, लघु आणि मध्यम-स्तरीय अन्न उद्योग आणि कृषी-पर्यावरण पर्यटन केंद्रांसह विविध क्षेत्रांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी होऊ शकेल.

शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे.. 

या आविष्काराच्या तंत्रज्ञान हस्तांतरातून गोव्यातील नेत्रावली येथील मेसर्स तनशीकर स्पाइस फार्म आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा या संस्थांनी आधीच यशस्वी व्यापारी उत्पादन सुरू केले आहे. हे नव उत्पादन म्हणजे सामाजिक - आर्थिक विकासाच्या दृष्टीने कृषी नवोन्मेषांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पारंपरिक जायफळ मसाल्याच्या उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त प्रत्येक झाडामागे 5 हजार 600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. गोव्यातील आयसीएआर - सीसीएआरआय च्या इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट युनिटने पेटंट अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीशेतकरीफळेदिल्ली