यंदा उन्हाळा तसा खूप लवकर सुरू झाला आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ३९ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले आहे. पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
हे दरवर्षीचे नॉर्मल होत चालले आहे. त्यामुळे एकूणच ही जागतिक तापमान वाढ ओळखून प्रत्येक पशुपालकांनी आपण जसे आपले दैनंदिन व्यवहारांमध्ये बदल करत आहोत तसे बदल पशुधनाच्या बाबतीत देखील नक्कीच करावे लागणार आहेत.
जनावरांचे उष्णता नियमन- जनावरांना मुळातच उष्णता नियमन करता येत नाही. घामाच्या रूपाने उष्णतेचे नियमन करण्यासाठी घामाच्या ग्रंथीची पुरेची वाढ नसल्यामुळे श्वासोच्छवासाची गती वाढवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.- सोबत रवंथ करताना जनावराच्या पोटात किण्वन प्रक्रिया सुरू असते. त्याद्वारे देखील उष्णता निर्माण होत असते. त्यासाठी देखील रवंथ करणाऱ्या जनावरांना विशेष प्रयत्न करावे लागतात.
तापमान वाढल्यानंतर जनावरांत दिसणारी लक्षणे- तापमान वाढीसह हवेतील आर्द्रता देखील जनावरांचे ताण-तणाव वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत.- साधारणपणे ४० अंश सेल्सिअस (१०४ अंश फॅरेनाईट) व त्यापेक्षा जास्त तापमान सात आठ तास राहिले तर जनावर धापा टाकते.- तोंडाने श्वासोच्छवास करते. लाळ गळते. पाणी पिण्यासाठी जनावर धाव घेते.- श्वासोच्छवासाचा दर प्रति मिनिट १०० पर्यंत वाढतो. लाळ गळल्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते.- सामू बिघडून त्याचा परिणाम पोटातील किण्वन प्रक्रियेवर होतो. पचनशक्ती क्षीण होते.- अन्न घटकांची शोषण प्रक्रिया मंदावून दूध उत्पादन घटते.- लाळ व लघवी याचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईटची कमतरता निर्माण होऊन जनावरांचे वजन देखील घटते.- एकूणच खाद्य खाण्याचे प्रमाण ३० टक्के घटते व दुधाचे उत्पादन हे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पर्यंत घटते.- दुधाची गुणवत्ता, फॅट, एसएनएफ सुद्धा घटते.- स्तनदाहाचे प्रमाण वाढते, माज न ओळखता आल्यामुळे कृत्रिम वेतनांची संख्या प्रती जनावर वाढते.- तात्पुरते वंध्यत्व वाढीस लागते व त्यामुळे पशुपालकांना तोटा सहन करावा लागतो.
कशी घ्याल जनावरांची काळजी?१) यासाठी पशुधनाला चांगला निवारा असावा.२) नियमित पिण्यासाठी थंड पाण्याची उपलब्धता करून द्यावी.३) पाणी देखील सहज उपलब्ध व्हावे व निवांतपणे त्यांना पाणी पिता यावे अशी सोय करावी.४) सोबत तुषार सिंचन व पंख्याची सोय करून गोठ्यातील वातावरण थंड ठेवता येते.५) एकाच वेळी स्प्रिंकलर व पंखे सुरू केल्यास ओले शरीर थंड होताना चांगले परिणाम दिसून येतात.६) कमीत कमी तंतुमय पदार्थ असणारी वैरण द्यावी.७) पशुखाद्य व वैरण नेहमी रात्रीच्या वेळी आठ ते सकाळी आठ या दरम्यान द्यावे.८) चांगल्या प्रतीचे खनिज मिश्रण देणे केव्हाही चांगले.९) जनावरे चरायला सोडत असल्यास सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा सोडावेत.१०) गोठ्याभोवती शेडनेट, पशुखाद्याची बारदाने बांधून दिवसातून दोन-तीन वेळा भिजवल्यास उष्ण हवा गोठ्यात येणार नाही. आतील वातावरण देखील थंड राहील.
अशा पद्धतीने थोडीशी काळजी घेतली व व्यवस्थापनात बदल केले तर उन्हाळ्यासह वाढलेले तापमान हे पशुधनासाठी निश्चितच सुसह्य करता येईल यात शंका नाही.
डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: प्रत्येक गोठ्यात पशुप्रथमोपचार पेटी का असावी? व त्यात काय असावे? वाचा सविस्तर