Join us

Goat Care In Rain पावसाळ्यात अशी घ्या शेळ्यांची काळजी; टळेल आर्थिक हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 8:04 PM

शेळीपालन करतांना योग्य व्यवस्थापन नसेल तर अधिक खर्च होऊन काहीच उत्पन्न हाती लागत नाही. यासाठीच शेळीपालनात योग्य व्यवस्थापनास अधिक महत्व दिले गेले आहे. मग हे व्यवस्थापन करतांना काय करावे काय करू नये यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

शेळीपालन करतांना योग्य व्यवस्थापन नसेल तर अधिक खर्च होऊन काहीच उत्पन्न हाती लागत नाही. यासाठीच शेळीपालनात योग्य व्यवस्थापनास अधिक महत्व दिले गेले आहे.

शेळीपालन करतांना व्यवस्थापनात (Goat Farming Management) सर्वात जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आद्रता कमी राखण्यासाठी घ्यावी लागते. कारण शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्वसनसंस्थेचे रोग होण्याची शक्यता असते. 

पावसाळ्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शेळ्यांच्या व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. तसेच शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घेणे देखील गरजेचे असते.

शेळीपालन करतांना व्यवस्थापनातील काही महत्वाच्या बाबी (Goat Care)

१) कळपातील सर्व शेळ्यांना वेळोवेळी जंतनाशक औषधे द्यावीत. त्यामुळे शेळ्यांचा कळप जंतमुक्त राहू शकेल.

२) पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेली आर्द्रता आणि उष्णता जंतांची अंडी, गोचीड वाढीसाठी अनुकूल असते. अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचीड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात. गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. यावर उपाय म्हणून शेळ्यांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक औषध लावावे किंवा गोठा धुऊन घ्यावा.

३) शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही त्यामुळे गोठ्यातील आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी ६० वॉटचा विजेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा.

४) गोठ्यातील मलमूत्र रोजच्या रोज साफ करून गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसर पणा राहून पायाला फोड येतात. यामुळे शेळ्या लंगडतात तसेच ताप येतो परिणामी शेळी चारा कमी खाते अशक्त होतात.

५) पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. पावसात जास्त वेळ शेळी भिजली की न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते.

६) पावसाळ्यात आलेल्या कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, जास्त प्रमाणात हा चारा खाल्यामुळे शेळ्यांना अपचन होते. पोटफुगी, हगवणीसारखे आजार होतात. पोटफुगी होऊ नये यासाठी खाण्याचे तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते.

७) पावसाळ्यात करडामधील मरतुकीचे प्रमाण अधिक असते अशावेळी मरतुकीचे प्रमाण ५ ते १० टक्क्यांपर्यंत राखले पाहिजे. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जन्मानंतर २४ तासांच्या आत करडांना चीक/दूध पाजावे. त्यामुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती व ऊर्जा मिळते व त्यांची पचनसंस्था साफ होण्यास मदत होते.

८) गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी, कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहते. ज्यामुळे चालताना घसरून पडणे हा प्रकार आढळतो परिणामी गर्भपात होण्याची शक्यता असते.

९) पावसाळ्यात शेळ्या विण्याचे प्रमाण अधिक असून या काळात गर्भाशयाचे तोंड उघडे असते. अशावेळी योनीचा भाग व बाजूचा भाग स्वच्छ नसेल तर गर्भाशयात जंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते. यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी व सौम्य जंतुनाशकाचा वापर करून धुऊन काढावा व योनीची जागा स्वच्छता ठेवावी.

१०) शेळ्यांसाठी पावसाळ्यात कोरड्या वैरणीचा अधिकाधिक वापर करावा. जसे की ज्वारीच्या कडब्याची कुट्टी, हरभरा भुस्सा, तूर भुस्सा.

डॉ. श्रीकांत मोहन खुपसेसहायक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगरवडॉ. एन. एम मस्केप्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर,प्रा. एस. एस. जंजाळसहायक प्राध्यापक एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - Animal Care नका होऊ देऊ दुर्लक्ष; पावसाळ्यात विविध आजारांचे असते पशुधनावर लक्ष

टॅग्स :शेळीपालनदुग्धव्यवसायशेतकरीशेतीशेती क्षेत्रपाऊस