Join us

जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 3:59 PM

दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक असावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा पी.एच. व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इत्यादींवर अवलंबून असते.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला कुठलाही वास नसावा. पाण्याला वास त्यात मिसळलेल्या जैविक तत्त्वे, धातू, मातीचे कण इत्यादींमुळे येतो. नदीच्या, तळ्याच्या पाण्यात कुजलेली गवते, झाडे किंवा मेलेली जनावरे इत्यादींमुळे वास येतो.

कुठल्याही प्रकारचा वास येणारे पाणी जनावरांना पाजू नये, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला उग्र चव नसावी. कीटकनाशके, कारखान्यांतील विषारी पदार्थ, गवत कुजून नदीतील पाण्याची चव बदलू शकते, असे पाणी जनावरांना पाजू नये.

पाण्याचा रंग किंवा गढूळतेनुसार पाण्यात दूषितपणा ओळखण्यास मदत होते. गढूळ पाणी जनावरांना देण्यास योग्य नसते. पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची जैविक तत्त्वे, क्षार, धातूचे कण प्रमाणापेक्षा जास्त असू नयेत. पाण्यामध्ये जिवाणू, पोटातील कृमी, अळ्या नसाव्यात, ज्यामुळे जनावरांना आजार होण्याची शक्यता असते.

पिण्याचे पाणी पिंपात किंवा बादलीत साठवून जनावरांना पाजत असाल, तर तुरटीचा एक तुकडा घेऊन तो पिंपात किंवा बादलीच्या पाण्यात गोल-गोल फिरवावा. तुरटीमुळे पाण्याला आलेला वेगळा रंग, जिवाणू नष्ट होतात व मातीचे कण तळाशी जातात. त्यानंतर वरचे नितळ पाणी दुसऱ्या बादलीत किंवा पिंपात ओतावे व नंतर जनावरांना पाजावे.

पाण्यात जर जंतू असतील, तर एक चमचाभर हळद टाकावी व मगच लहान वासरांना, जनांवरांना पाजावे. लहान वासरू आजारी असल्यास उकळून गार केलेले पाणी नियमित पाजावे. पाणी १५ ते २० मिनिटे चांगले उकळून थंड करून वासरास पाजावे.

जनावरांना दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चार वेळा पाणी दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के जास्त दूध देतात. जनावरांनी जर हिरवा चारा (६५ ते ८५ टक्के पाण्याचा अंश) खाल्ला, तर ते पाणी कमी प्रमाणात पितात; मात्र उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मात्रा कमी असते, त्यामुळे ते सुका/वाळलेला चारा (दहा टक्के पाण्याचा अंश) जास्त खातात. त्यामुळे त्यांना उन्हाळ्यात जास्त पाणी पाजावे.

जनावरांचे पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर जनावरे जास्त पाणी पितात. पाणी शुद्ध करण्याच्या उपाययोजना करून जर पाणी जनावरांना पिण्यास दिले, तर दूध उत्पादन वाढू शकते.

ग्रामीण भागात जनावरे सहसा तळ्यावर, नदीवर, हौदावर पाणी पितात. बऱ्याच वेळा जनावरे तळ्यातील, नदीतील पाण्यात आत जाऊन पाणी पितात.

त्यावेळी त्यांचे मल-मूत्र पाण्यात मिसळते. गावातील सांडपाणी, गोठ्यातील मल-मूत्र, जवळच्या कारखान्यांतील पाणी, शेतात वापरलेली कीटकनाशके इत्यादी पाण्यात मिसळल्याने, आजारी जनावरांनी पाणवठ्यावर पाणी पिणे इत्यादी कारणांनी पिण्याचे पाणी दूषित होते व रोगजंतूंची वाढ होते.

प्रतिबंधात्मक उपायगावातील तळे, हौद, टाक्यांतील पाणी दूषित होण्याची कारणे शोधावीत.पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून त्यातील रोगजंतूंचे परीक्षण करून त्यानुसार पाणी शुद्धीकरणाचे उपाय योजावेत.पाण्यापासून जनावरांना आजार हे घरगुती सांडपाणी, गोठ्यातील मल-मूत्र, मेलेले जनावर पाण्यात सडणे इत्यादी प्रकारांमुळे होतात, त्यामुळे या सर्व बाबी पाण्यात मिसळणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.गावातील तळ्यात किंवा नदीतील पाण्यात जवळील कारखान्यातील टाकाऊ पदार्थ किंवा शेतातील कीटकनाशके मिसळण्याची शक्यता असते, त्यामुळे हे घटक पाण्यात मिसळणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.गावात ग्रामसभा घेऊन लोकांना पाण्यापासून जनावरांना होणारे आजार व त्याबद्दलची उपाययोजना यांची माहिती द्यावी. गावातील लोकांनी एकत्र येऊन गावातील पाणवठे दूषित होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी.पाण्याची साठवण हौदात, पिंपात करत असल्यास हौद, पिंप वेळोवेळी स्वच्छ धुवावे, सूर्यप्रकाशात कोरडे करूनच पाण्याची साठवण करावी.उन्हाळ्यात हौदात किंवा मोठ्या पाण्याच्या टाकीत पाणी जास्त वेळ साठवल्याने शेवाळाचा थर तयार होतो, तो काढून हौद वेळोवेळी स्वच्छ धुवावा.पाण्यापासून आजार झाल्यास जनावरांचे पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधपाणीशेतकरीआरोग्य