Agriculture News : मार्चपासूनच उन्हाचा (Temperature) तडाखा चांगलाच बसू लागला आहे. या दिवसांत ग्रामीण भागात उघड्या बोडक्या घरांशिवाय काहीच दिसत नाही. या भर उन्हातही आदिवासी बांधवांची कामे सुरु असतात.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) आदिवासी भागात या दिवसांत कुठली कामे सुरु असतात, ती कशी केली जातात? याबाबत या मालिकेतून उलगडा करणार आहोत. त्यापैकी आजच्या पहिल्या भागातून वैरण गोळा करणे (Vairan Vikas Yojana) या कामाविषयी थोडक्यात समजून घेऊयात....
तर नाशिक जिल्ह्याचा विचार करता त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण आदी तालुक्यात भात शेती केली जाते. शिवाय पशुपालनाचाही व्यवसाय दिसून येतो. भात पीक काढून झाल्यानंतर रचून ठेवलेल्या भात पिकाची वैरण तयार करणे, ती गोळा करण्याची लगबग सुरू झाली आहे. कारण पावसाळ्यात चार महिने जनावरांना ही वैरण लागत असते.
दरम्यान भात झोडपल्यानंतर भाताच्या पेंढ्या शेतातच पडून असतात. मग या दिवसांत खळे तयार करून पेंढ्याची मळणी केली जाते. या काळात मागील काही वर्षात पाऊस होत असल्याने चारा भिजू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागत असते. भाताच्या पेंढ्याची मळणी केल्यानंतर जो चारा निघतो यालाच वैरण असे म्हणतात.
मग ही वैरण बैलगाडीच्या साहायाने, ट्रॅक्टरच्या साहाय्याने घरी आणली जाते. किंवा जिथे स्टोअर करायची आहे, अशा ठिकाणी आणून टाकली जाते. यानंतर ज्यांना शक्य आहे ते घरात साठवतात तर काहीजण खळ्यावरच संरक्षणाच्या दृष्टीने रचून ठेवतात. अशा पद्धतीने पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून आदिवासी बांधव उन्हाळ्यात वैरण गोळा करतात. तिची साठवणूक करतात.