Join us

गोवीळ ग्रामस्थांनी अनुभवला नांगरणी स्पर्धेचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 11:57 AM

कोकणात मागच्या काही वर्षांपासून भातलावणी आणि चिखल नांगरणी स्पर्धांचे आयोजन होत असून त्यातून शेती आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असते.

लांजा तालुक्यातील गोवीळ ग्रामस्थ मंडळातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत घाटी बैलजोडी गटात रविराज गणेश लाखन यांच्या बैल जोडीने २२.६३ सेकंद घेत प्रथम क्रमांक पटकावला. गावठी बैलजोडी गटात मार्लेश्वर येथील बाळा गुरव यांच्या बैलजोडीने २२.४४ सेकंद घेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतून ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

कोकणात मागच्या काही वर्षांपासून भातलावणी आणि चिखल नांगरणी स्पर्धांचे आयोजन होत असून त्यातून शेती आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असते. वर्षानुगणिक या स्पर्धा कोकणातील लाल मातीच्या चिखलात चैतन्य आणत असून युवकांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीसे दिली जातात.

घाटी बैलजोडी स्पर्धेत द्वितीयक्रमांक प्रभाकर पडवळकर २२.६९ सेकंद, तृतीय क्रमांक द्वारकानाथ माने  २३.२८ सेकंद, चौथा क्रमांक भारत रामजी कांबळे २४.१९ सेकंद आणि पाचवा क्रमांक रमेश पावस्कर यांच्या बैलजोडीने २६.६९ पटकावला.

गावठी बैलजोडी गटात अमोल गुरव (कनकाडी) यांच्या बैलजोडीने २४.७५ सेकंद घेत द्वितीय, आदिष्टीकृपा गोवीळ २७.२८ सेकंद घेत तृतीय, शुभम सुर्वे (संगमेश्वर) २७.३४ सेकंद घेत चौथा आणि पाचवा क्रमांक समीर शिर्के (देवळे) आणि जय हनुमान (केळवली) २९.३७ सेकंद घेतल्याने विभागून पाचवा क्रमांक देण्यात आला.

स्पर्धेतील घाटी बैलजोडी गटात पहिल्या क्रमांकासाठी ११,१११ रुपये, द्वितीय क्रमांकाला ७,७७७ रुपये, तृतीय क्रमांकाला ५,५५५ व ढाल तसेच उत्तेजनार्थसाठी १ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच गावठी बैलजोडी गटात पहिल्या क्रमांकासाठी ७,७७७ रुपये, द्वितीय क्रमांकाला ५,५५५ रुपये, तृतीय क्रमांकाला ३,३३३ रुपये व ढाल, तसेच उत्तेजनार्थचे प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :मोसमी पाऊसशेतीकोकण