Join us

Purse seine net fishing : पर्ससीन नेट मासेमारीसाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:35 AM

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून मासेमारी बंदीमुळे पर्ससीननेट मासेमारी बंद होती. मात्र, १ सप्टेंबरपासून पुन्हा पर्ससीननेट मासेमारीला सुरुवात होणार आहे.

रत्नागिरी: जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून मासेमारी बंदीमुळे पर्ससीननेट मासेमारी बंद होती. मात्र, १ सप्टेंबरपासून पुन्हा पर्ससीननेट मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पर्ससीननेटधारक तयारीला लागले असून, त्यांची धावपळ सुरू झालेली आहे.

खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होते. मात्र, पर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलेली असते. आठवडाभरानंतर पर्ससीननेट मासेमारांची प्रतीक्षा संपणार आहे.

गतवर्षीचा मासेमारी हंगामामध्ये पर्ससीन मासेमारी सततच्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे पर्ससीननेट नौका मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

खोल समुद्रातील मासेमारी सुरू झालेली असली तरी पावसामुळे समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये उसळलेल्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला जोरदार वारा, अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागत आहे.

या परिस्थितीमध्ये पर्ससीननेट वगळता इतर यांत्रिकी होड्या, बिगर यांत्रिकी नौका नव्या हंगामाला सामोरे जात आहेत. मात्र, पर्ससीन नेट मासेमारी सुरू होण्यासाठी आठवडाभराचा अवधी असल्याने नौकांची डागडुजी, रंगरंगोटी आणि जाळ्यांची कामे सुरू आहेत.

चारच महिने पर्ससीननेट मासेमारीपर्ससीननेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून सुरुवात होते. मात्र, शासनाच्या आदेशाप्रमाणे ३१ डिसेंबरपर्यंतच मासेमारी करता येते. त्यानंतर पर्ससीननेट मासेमारी बंद ठेवण्यात येते. हा बंदी कालावधी १ जानेवारी ते ३१ ऑगस्टपर्यंत असतो. त्यामुळे पर्ससीननेट मासेमारीला केवळ चारच महिने कालावधी मिळतो. तर इतर मासेमारी करणाऱ्या नौकांना १० महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

नौका मालकांचे आर्थिक नुकसानपर्ससीन नौका मालकांना खलाशांची वानवा नेहमीच सतावत असते. परराज्यांतील तसेच नेपाळी खलाशी पलायन मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे अनामत रक्कम देऊनही अनेक खलाशी परस्पर न सांगता निघून जातात. त्यामुळे मासेमारी हंगामातच खलाशांची कमतरता भासू लागते. खलाशी नसल्याने नौका नांगरावर ठेवाव्या लागतात. तसेच अनामत रकमाही बुडतात. त्यामुळे नौका मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.

नेपाळी खलाशांचा भरणास्थानिक खलाशी मिळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व अन्य राज्यांतील खलाशी घेण्यात येतात. मागील पाच-सहा वर्षापासून पर्ससीन नौका वाढल्याने खलाशांची संख्याही वाढलेली आहे. त्यासाठी आपल्या देशाच्या सीमेपलीकडील नेपाळहून खलाशी आणले जातात. त्यामुळे पर्ससीन नौकांवर नेपाळी खलाशांचा भरणा अधिक आहे.

टॅग्स :मच्छीमारमहाराष्ट्रकोकणपाऊसरत्नागिरी