Join us

केंद्राकडून घेतले ३२१ कोटी, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले केवळ २१६ कोटी; पीक विमा कंपनीला १०५ कोटींचा निव्वळ नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 1:28 PM

सरकारच्या मानगुटीवर बसून ३२१ कोटी घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २१६ कोटी वाटप केले आहेत. तीन लाख ८५ हजार ३५३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे. मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाई वाटप करताना नाकीनऊ आलेल्या विमा कंपनीला रब्बी हंगामाची नुकसान भरपाई देणे शक्य आहे का?, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अरुण बारस्कर

सोलापूर : सरकारच्या मानगुटीवर बसून ३२१ कोटी घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी २१६ कोटी वाटप केले आहेत. तीन लाख ८५ हजार ३५३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे. मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाई वाटप करताना नाकीनऊ आलेल्या विमा कंपनीला रब्बी हंगामाची नुकसान भरपाई देणे शक्य आहे का?, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी पाऊस नसल्याने खरीप पिकांचा अक्षरशा धुराळा उडाला होता. पेरणी तर केली शिवाय शेतकऱ्यांकडून एक रुपयांत विमा भरणा झाल्याने शासनाच्या हिश्श्याची ३२१ कोटी ३० लाख इतकी रक्कम विमा कंपनीला तेव्हाच जमा झाली होती. सरकारकडून भरपेट रक्कम घेणाऱ्या विमा कंपनीने संपूर्ण एक वर्षात शेतकऱ्यांना कंपनीच्या सोईने व जमेल तशी व जमेल तेवढीच रक्कम वाटप केली आहे.

मागील संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांसाठी फारच नुकसानकारक होते. ऐन पावसाळ्यातही कडक उन्ह पडत होते. खरीप तर आले नाहीच शिवाय रब्बीही साधले नव्हते. मात्र विम्यापोटी रक्कम घेऊनही शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेतला. मागील वर्षी खरीप हंगामात १०५ कोटींची कमाई केलेल्या विमा कंपनीने रब्बी हंगामातील पीक विम्यासाठ शासनाकडून १३३ कोटी रुपये घेऊनह शेतकऱ्यांना अद्याप काहीही दिले नाही.

३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा..

खरीप २०२३ या हंगामात ६ लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी ५ लाख २३ हजार १७६ हेक्टरसाठी एक रुपयांप्रमाणे विमा भरला होता. ३२१ कोटी ३० लाख रुपये घेतलेल्या विमा कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात (२५ टक्के अॅग्रीम) व पीक कापणी प्रयोगावर आधारित अशी वर्षभरात २१६ कोटी ३ लाख ८५ हजार ३५३ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

दृष्टीक्षेप..

मागील रब्बी हंगामात जिल्ह्यातील तीन लाख ७९ हजार ४१७ शेतकऱ्यांनी तीन लाख तीन हजार हेक्टर क्षेत्राचा विमा भरला आहे. शेतकरी, केंद्र व राज्य शासनाकडून विमा कंपनीला १३३ कोटी रुपये मिळाले आहेत. विमा कंपनी शेतकऱ्यांना किती रक्कम देणार?, देणार की नाही?, हे कंपनीवर अवलंबून आहे.

तालुका रक्कम हेक्टर शेतकरी 
अक्कलकोट३६.२२ ५५३४५ ६६३११ 
बार्शी ६२.०६ ८४९२० ९०२५५ 
करमाळा १८.०४ २६५३० ४५१४७ 
माढा २५.६७ २२८९८ ३७१२० 
माळशिरस १.८२ ६०७३ ८१७२ 
मंगळवेढा१५.९७ ३०२६३ ५४५६२ 
मोहोळ ७.८८ १२२३२ १२२४७ 
सांगोला १९.७४ ३२६६० ४८७०० 
उ. सोलापूर १४.६६ १८३७९ १६१२४ 
द. सोलापूर१४.१७ १५७०७ १४८२० 
पंढरपूर २५ लाख १०३९ ८९५ 
एकूण २१६.४६ ३०५१४९ ३८५३५३ 
(सर्व रक्कम कोटीत)    

आमच्याशी व्हॉटसअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा. 

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रशेतकरीशेतीसोलापूरसरकार