Join us

पलूस तालुक्यात ५ हजार हेक्टर द्राक्ष शेती पावसाने अडचणीत.. छाटण्या लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 5:00 PM

पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसाने धोक्यात आले आहे.

नितीन पाटीलपलूस : पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसाने धोक्यात आले आहे.

हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे. शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने हंगामातील बागांची छाटणी थांबली असून आगाप केलेल्या बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पलूसच्या शेतकऱ्यांनी देशासह परदेशात द्राक्षांचा दर्जा उंचावला. याचमुळे जागतिक बाजारपेठेत पलूसच्या द्राक्षाला चांगली मागणी होऊ लागली आहे, मात्र याच द्राक्ष शेतीला गेल्या पाच महिन्यांपासून मुसळधार पावसाचे ग्रहण लागले आहे.

आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने द्राक्षबागांची ५० टक्क्यांपेक्षा अधिक छाटणी लांबणीवर पडली आहे. या पावसामुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागांवर फळकुज दावण्या, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सप्टेंबरअखेर होणारी फळ छाटणी लांबणीवर गेली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बागांची पानगळ झाली आहे. द्राक्ष बागेत ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करताना, पाण्यातून काम करताना मजुरांना सर्कस करावी लागत आहे.

पावसामुळे व चिखलामुळे मजूर मिळणे शेतकऱ्यास अवघड बनले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आगाप छाटणी घेतली आहे त्या बागांच्या पानगळतीमुळे या वर्षी झाडांना द्राक्षे येतील, अशी आशा आता मावळत चालली आहे.

शेतकऱ्याचे द्राक्ष बागेसाठी खर्च केलेले पैसे वाया जाण्याची चिन्हे आहेत. द्राक्ष बागायतदारांना एकरी पाच लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातन होत आहे.

पाच लाख रुपयांच्या मदतीची मागणीद्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश तत्काळ द्यावेत. द्राक्ष बागायतदारांना सरसकट पाच लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर द्राक्ष उत्पादक शेतकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक लाड यांनी दिला.

टॅग्स :द्राक्षेपीकपाऊसशेतकरीशेती