Join us

राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 11:07 AM

धनंजय मुंडे, मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. २१/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या कालावधीत मौजे परळी वै. जि. बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचे माध्यमातुन शेतकऱ्यांना  आपआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होऊ शकतो.

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरीता धनंजय मुंडे, मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. २१/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या कालावधीत मौजे परळी वै. जि. बीड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या  कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), शिवराजसिंहजी चौहान (मंत्री, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार), देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), धनंजय मुंडे (मंत्री, कृषी, महाराष्ट्र राज्य तथा, पालकमंत्री बीड जिल्हा), संजय बनसोडे, (मंत्री, क्रीडा व युवक कल्याण बंदरे महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते होणार आहे. याशिवाय इतर मा. संसद सदस्य, मा. विधान परिषद सदस्य, मा. विधानसभा सदस्य महोदय व विविध विभागाचे सन्माननीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून या प्रदर्शनात ४०० पेक्षा जास्त दालने लावण्यात येणार आहेत. तसेच परिसंवाद, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, प्रक्रिया उद्योग यांचे विशेष सादरीकरण होणार आहे.

सदरील पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पौष्टीक तृणधान्य महोत्सव, सेंद्रीय शेती दालन, खरेदीदार विक्रेता संमेलन, पशू प्रदर्शन, ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक, रानभाजी महोत्सव, धान्य व इतर शेतीमाल प्रदर्शन व विक्री, शेती निगडीत औजारे खरेदी विक्री दालन व कृषि उत्पादने, स्वयं सहाय्य महिला बचत गट निर्मित वस्तू /पदार्थ विक्री भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवात पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी भेट देतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, कंदभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरिराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात.

तसेच सदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

त्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरीभागातील नागरिकांना होणेसाठी व विक्री व्यवस्था करुन रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होणेसाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करणेसाठी रानभाज्यांचे प्रदर्शन देखील या कृषी महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

या महोत्सवात कृषी संलग्न विभागांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. तरी राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कृषी महोत्सवास भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन धनंजय मुंडे, मंत्री  कृषी, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील शेतकरी बांधवाना केलेले आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीबीडपरळीधनंजय मुंडेमहाराष्ट्रराज्य सरकारसरकारशिवराज सिंह चौहानएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसकृषी विज्ञान केंद्र