भंडारा : भाजीपाल्याच्या दरात खूप मोठी घसरण (Vegetable Price Down) सुरू आहे. कोबी उत्पादक तर मोठ्या संकटात सापडले आहेत. बऱ्याच बागायतदारांनी कोबी न काढलेली बरी म्हणत तशीच ठेवली. भेंडीने उत्पादकांना तारले. गत महिनाभरापासून भेंडीला (Bhendi Market) प्रति किलो ३० रुपयांचा दर मिळत आहे. किमान अर्धा एकरात ५० हजार रुपयांचा उत्पन्न पदरी पडतो आहे. त्यातील अर्धे अधिक नफ्याचे समजायला हरकत नाही.
भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) पालांदूर परिसरात बागायतीचे मोठे क्षेत्र आहे. सर्वच पिकांची लागवड केली जाते. दिवाळीपासून भाजीपाल्याची मोठी आवक तयार होते. सर्वांची एकाच वेळी आवक होत असल्याने बाजारपेठेत दर पडतात. नोव्हेंबर अखेरपर्यंत भाव बरे असतात. त्यानंतर मात्र सपाट्याने घसरतात.
फुलकोबी २ रुपये किलोने विकावी लागली. टमाटरचे दरही कमी झाले. वांग्यानी थोडीफार मिळकत कायम ठेवली. मात्र भेंडीने ३० रुपये किलोने नियमितपणे भाव दिला आहे. पुढे जशी जशी उष्णता वाढत जाईल तसतसे भेंडीचे भावसुद्धा वधारण्याची शक्यता अधिक आहे.
बॉक्स
भेंडीची होते निर्यात
भेंडी वर्षभर उत्पादन देते. विशेषता अर्ध्या एप्रिलपर्यंत निर्यात सुरू राहते. त्यानंतर वाढत्या तापमानामुळे निर्यात थांबते. निर्यात सुरू असल्यास भेंडीला वीस रुपयांच्या वरच दर मिळतो. निर्यात थांबली तर मात्र स्थानिक बाजारपेठेत २० रुपयापर्यंत दर येतात.
एक दिवसाआड होतो तोडा...
भाजीपाल्याच्या पिकात भेंडीचा तोडा एक दिवसात येतो. काही भागात दोन दिवसांनंतर करतात. मात्र भेंडीचा तोडा शक्यतो एक दिवसाआड केल्यास उत्पन्नात वाढ होऊन झाड अर्थात बाग सुरक्षित राहते. नगदी उत्पन्न हाती येते. बागायतदाराच्या घरी रोजच पैसा खेळत असतो. त्यामुळे बरेच बागायतदार प्रत्येक हंगामात भेंडी लागवडीला पसंती देतो.
खरीप हंगाम संपल्यानंतर लगेच भेंडीची लागवड केली. दीड महिन्यात उत्पन्न सुरू झाले. आठवड्याभरात दोन किंवा तीन तोडे करतो. ३० रुपयांचा दर मिळत असल्याने आर्थिक आवक समाधानकारक आहे. इतर भाजीपाल्यापेक्षा भेंडी निश्चितच परवडणारी आहे.
- टिंकू देशमुख, भेंडी उत्पादक, पालांदूर.