कोल्हापूर : मागील हंगामातील गाळप उसाला काहीतरी दिले पाहिजे, यावर 'स्वाभिमानी'सह इतर संघटना ठाम राहिल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील साखर कारखानदार व संघटना प्रतिनिधींची बैठक तिसऱ्यांदा फिस्कटली. मागील हंगामातील उसाच्या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतला, पण तो राजू शेट्टी यांनी अमान्य करत रविवारचा चक्का जाम आंदोलन होणारच, असे सांगितल्याने हंगामापुढील पेच कायम राहिला आहे.
मागील हंगामातील चारशे रुपये व चालू हंगामात प्रतिटन ३५०० रुपये द्यावा, या मागणीसाठी 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. गेली महिनाभर आंदोलनाचा वणवा पेटला असून तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा बैठक घेतली. पण ती अयशस्वी झाल्याने गुरुवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक बोलावत प्रस्ताव ठेवला. पण संघटनेने तो अमान्य केला. बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, धनाजी चुडमुंगे, विजय औताडे, पी. जी. मेढे आदी उपस्थित होते.
चालू हंगामात ३१०० च्या वर पहिली उचलचालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान ३१०० रुपये पहिली उचल दिली जाईल, असे कारखानदारांनी मान्य केले. पण, मागील हंगामाचे बोला, मग चालूवर चर्चा करू, या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिले.