Join us

Cotton Cultivation : "कापूस, तूर लागवडीसाठी एकात्मिक पीक पद्धतींचा अवलंब करावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 7:42 PM

०१ जून २०२४ रोजी आयोजित ९९ व्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमामध्ये डॉ.पवार यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

 छत्रपती संभाजीनगर : कापूस व तूर या दोन्ही पिकामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड, बीजप्रक्रिया करणे, योग्य अंतर, माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या बाबींचा अवलंब केला तर दोन्ही पिकामध्ये चांगले उत्पादन येऊ शकते, असे मत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प चे प्रमुख डॉ.सुर्यकांत पवार यांनी व्यक्त केले. कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे ०१ जून २०२४ रोजी आयोजित ९९ व्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमामध्ये डॉ.पवार यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये डॉ.सुर्यकांत पवार कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच विषय विशेषज्ञ प्रा.गीता यादव, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, गंगापूरचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री.दिलीप मोटे व मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पवार म्हणाले कि, मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत कापसाची लागवड करावी. लागवडीपूर्वी सेंद्रिय खतांचा वापर करावा. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड करावी. कोरडवाहू लागवडीसाठी कमी (१४०-१५० दिवस) ते मध्यम (१५०-१६० दिवस) तर बागायती लागवडीसाठी १६०-१८० दिवस कालावधीची वाणे योग्य राहतील. कोरडवाहू साठी मान्सूनचा पाऊस ७५-१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच कापसाची लागवड करावी.

लागवडीसाठी कोरडवाहू साठी १२०x४५ सेंमी, बागायती साठी १८० x३० सेंमी किंवा १५० x ३० सेंमी, जोडओळ साठी १२०-६० x६० सेंमी तर बीटी सघन लागवड साठी ९० x ३० सेंमी या प्रमाणे लागवड अंतर घ्यावे. लागवडी पूर्वी जैविक ची बीज प्रक्रिया नक्की करावी. तसेच कापूस पिकामध्ये मुग, उडीद, सोयाबीन, तूर यांची आंतरपिके देखील घेता येतात. माती परीक्षणा नुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून पिकाला लागेल तेवढेच पाणी द्यावे.

कापूस पिकातील कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनचएकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतींचा अवलंब सर्व शेतकऱ्यांनी करावा. तूर पिकाच्या लागवडी बद्दल बोलताना डॉ.पवार म्हणाले कि, मध्यम जमिनीसाठी किंवा कोरडवाहू लागवडीसाठी बीडीएन ७११, बीडीएन ७०८,इत्यादी कमी कालावधीच्या तर भारी जमिनीसाठी किंवा बागायती लागवडीसाठी गोदावरी, बीएसएमआर ७३६ इत्यादी जातींची निवड करावी. तुरीची लागवड करण्यापूर्वी थायरम / बाविस्टीन ०२ ग्राम प्रति किलो बियाणे तसेच २५० ग्राम रायझोबियम व स्फुरद विरघळणारेजीवाणू प्रति १० इलो बियाणे तसेच ट्रायकोडर्मा ३ ते ४ ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तुरीची लागवड हि १५ जून ते १५ जुलै आणि जास्तीत जास्त ३० जुलै पर्यंतच करावी. नंतर लागवड केल्यास उत्पादनात घट येते. तसेच एकात्मिक अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

यावेळी प्रा.गीता यादव यांनी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शेतीमध्ये कशाप्रकारे करता येईल व त्याद्वारे शेतीतील उत्पादन वाढीस कशी मदत होईल याची सविस्तर माहिती दिली. बीबीएफ यंत्राची रचना, त्यामध्ये असलेले भाग, त्यांचे कार्य व यंत्राचा योग्य वापर कसा करायचा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे सर्व उपस्थित शास्त्रज्ञांनी दिली.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी