Join us

पांढऱ्या सोन्याची हेळसांड; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:23 PM

रेनटचचे कारण, इतर शेतमालाचीही कवडीमोल भावाने होतेय खरेदी

कापसाला चांगले दर मिळतील या आशेने शेळगावसह सोनपेठ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ केली. मात्र, नैसर्गिक संकटे अन् शेतमालाला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असल्याची स्थिती सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. रेन टचच्या नावाखाली कवडीमोल दराने कापूस खरेदी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सुरुवातीला सोयाबीन पिकाचे नुकसान केले. त्यानंतर शेतकऱ्यांची कापसावर मदार होती. अत्यल्प पावसामुळे तेही निम्म्यावर आले. शेतशिवारात वेचणीसाठी आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजला. आधीच निसर्गाचे संकट कमी होते की काय त्यात भर म्हणून आता कवडीमोल भाव मिळत आहे.शेती मशागती मशागतीपासून ते काढणी अन् बाजारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन येण्यापर्यंतच्या खर्चाचा विचार केल्यास मिळत असलेल्या भावामुळे हाती काहीच उरेनासे झाल्याचे शेतकऱ्यांमधून भावना वक्त होत आहेत. यातही बाजारात त्या 'रेन टच' कापसाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेना. रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा व तुरीला आदी पिकांना अवकाळी व धुक्याने फटका बसल्याची स्थिती असून, शासनाने शेतमाल दरवाढीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

घरात कापूस सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे

शार्टसर्किट, गॅस लिकेज किया चुलीमधील विस्तवामुळे आग लागण्याची भीती असते. अनेक शेतकऱ्यांकडे कापूस साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने ते घरातच कापूस ठेवतात, त्यातच गावामध्ये आग नियंत्रणासाठी साधने उपलब्ध होत नसतात. त्यामुळे अधिक काळ घरात कापूस ठेवणे धोकादायक झाले आहे.खर्च दुप्पट मात्र उत्पन्न कमी

• दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्याचाच ठरत असल्याचे दिसून येते. कोणतेही उत्पादन घेणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.

• शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासन प्रयत्न करीत असले तरी वास्तावात मात्र, शेतमालाच्या भावावाढीची स्थिती उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याची आहे.

• यामुळे शेतकऱ्यांना शेती करावी, तर कशी असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे औषधी, खते, बी-बियाणांच्या किमतीत दरवर्षी काहीना काही वाढ होते.

• मात्र, शेतमालाच्या बाबतीत शासन विचार कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :कापूसहवामानबाजार