Crop Insurance Updates : राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. तर सरकारने एक रूपयांत पीक विमा योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी आणखी दिलासा मिळत आहे. मागच्या वर्षी १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून यंदाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, यंदाचा खरीप हंगाम (Kharip Season) सुरू होऊन महिना उलटला असून अद्याप केवळ ५७ लाख शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. पेरण्या पूर्ण न झाल्यामुळे पीक विमा भरण्यास विलंब होत असून ३ जुलै सकाळी ११ वाजेपर्यंत ५६ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे.
तर मागच्या २४ तासांत ५ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत ही १५ जुलै असून ही तारीख वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीएससी केंद्र चालकांकडून एक रूपयांपेक्षा जास्त पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी असून कृषी विभागाकडून अशा केंद्रचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
कोणत्या विभागात किती आले अर्ज
- कोकण - २१ हजार ८०८
- नाशिक - ३ लाख ४९ हजार
- पुणे - ७ लाख २८ हजार
- कोल्हापूर - १ लाख ८ हजार
- छत्रपती संभाजीनगर - १७ लाख ३७ हजार
- लातूर - १५ लाख ६२ हजार
- अमरावती - ८ लाख ९८ हजार
- नागपूर - २ लाख ८४ हजार
- एकूण - ५६ लाख ९१ हजार