Join us

डीएपी, युरियाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात विक्री; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:22 AM

रॅक पॉइंट नसल्याने शेतकरी तेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया आणि विविध खते महाराष्ट्रात.

प्रतीक मुधोळकर

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधव शेतीची मशागत आटोपून आपल्या जमिनी सुपीक बनवत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना डीएपी आणि युरियाची गरज आहे. मात्र, राज्यात डीएपी आणि युरिया तसेच विविध खतांची कमतरता आहे. शिवाय रॅक पॉइंट नसल्याने शेतकरीतेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया आणि विविध खते घरपोच बोलावत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात खतांसाठी देसाईगंज येथे रॅक पॉइंट आहे. उपविभागात खतांसाठी रैंक पॉइंट नाही. देसाईगंजपर्यंतचे अंतर ३०० किमी अंतरावर आहे. रस्ते दुरवस्थेत आहेत. त्यामुळे अहेरी उपविभागात खतांचा पुरवठा वेळेवर होत नाही. खतांसाठी कृषी केंद्रात लांब रांगा लागत आहेत. शिवाय शेतकरी बांधवांचा वेळसुद्धा वाया जात आहे. त्यामुळे जास्त पैसे मोजून अहेरी उपविभागातील शेतकरी हे तेलंगणा राज्यातील गावातून विविध प्रकारची खते बोलावत आहेत.

अहेरी जवळून वांगेपल्ली नदीघाटावर पूल बनल्याने दिवसातून तेलंगणा राज्यातून अनेक वाहने महाराष्ट्रात डीएपी व युरिया आदी खते घेऊन येत आहेत. गुडेम, मानेपल्ली, बाबसागर, कागजनगर, मंचेरियालवरून व याचमार्गे शेतकरी खते बोलवत आहेत. तेलंगणात रेल्वे जंक्शन असलेल्या रामागुंडम येथे खतांचा कारखाना आहे. आणि मंचेरियाल येथे रॅक पॉइंट असल्याने महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या गावात आणि शहरात सहज डीएपी युरिया खत उपलब्ध होत आहे.

खतांवर केंद्र सरकारची सबसिडी असल्याने महाराष्ट्राचा शेतकरी जाऊन अधिकृत कृषी केंद्रात जाऊन आधार कार्ड देऊन आपले थम्ब लावून प्रक्रिया करून तेलंगणात खतांची खरेदी करू शकतो. मात्र, असे झाले नसेल तर ही अवैध खरेदी होऊ शकते. यासाठी आम्ही पथक तयार करून तपासणी करणार आहोत, पोलिसांचीही मदत घेणार आहोत. - संदेश खरात, तालुका कृषी अधिकारी अहेरी.

५५५ मेट्रिक टन बफर स्टॉक

अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना खताची कमतरता भासू नये यासाठी तालुक्यात युरियाचा ५०० मेट्रिक टन तर डीएपीचा ५० मेट्रिक टन बफर स्टॉक उपलब्ध आहे. अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

थेट पुरवठ्यावर बंदी; पण शेतकऱ्यांना खरेदीसाठी बंधने नाही

• विशेष म्हणजे, तेलंगणा राज्यातून परराज्यात सरळ विक्रीवर बंदी आहे. मात्र कुठलाही शेतकरी स्वतः येऊन खत खरेदी करू शकतो, अशी माहिती आहे. अहेरी उपविभागातील कृषी केंद्र चालकांना याचा फटका बसत आहे.

• शिवाय शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक बोजा उचलावा लागत आहे. तेलंगणा राज्यातून डीएपी, युरिया खत बोलून महाराष्ट्रात काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी व पोलिस विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

टॅग्स :खतेतेलंगणामहाराष्ट्रशेतकरीशेतीखरीपबाजारशेती क्षेत्रगडचिरोलीविदर्भ