अयोध्याप्रसाद गावकर
यावर्षी लांबलेल्या पावसामुळे आंबा कलमांना मोहोर एक महिना उशिरा आला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वसाधारणपणे पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहर येत असतो.
मात्र, यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील मोहर येण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये देवगड तालुक्यातील एकूण कलमांपैकी ७० टक्के कलमांना बहारदार असा मोहोर आला आहे. तर राहिलेल्या ३० टक्के कलमांना पालवी आल्याचेही दिसून येत आहे.
मात्र, या मोहोराला (आंबा कणी) फळधारणा कमी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील बागायतदार मोहोराला फळधारणा होण्यासाठी कीटकनाशक फवारणीप्रमाणेच वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या करत आहेत.
गेल्या एक महिन्यामध्ये देवगड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या कीटकनाशक औषधांची उलाढाल झाली असल्याचेही सांगण्यात येत आहे. देवगड तालुक्यामधील सुमारे ७० टक्के आंबा कलमांना बहारदार असा मोहर आला आहे.
मात्र, या मोहोराला फळधारणा कमी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील बागायतदार मोहोराला फळधारणा होण्यासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी करण्यामध्ये सध्या व्यस्त दिसून येत आहेत.
मोहोर आलेल्या कलमांना दुबारा मोहर जानेवारी महिन्याच्या अखेरीस येण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. या पुढील येणाऱ्या मोहोराला फळधारणा चांगल्याप्रकारे असू शकते, असा तज्ज्ञ बागायतदारांचा अंदाज आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. यामुळे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच आंबा मोसमाला सुरुवात झाली होती.
मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीसच आंब्याची चव खवय्यांना चाखता येणार आहे. सध्या आलेल्या मोहराला फळधारणा खूपच कमी असल्यामुळे यावर्षीच्या एकूण उत्पादनावरही साशंकता वर्तविण्यात येत आहे.
बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पण आंबा हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीसच आंब्याची चव चाखता येणार आहे.
आंबा बागायतदार किटकांच्या प्रादुर्भावाने चिंतेत
उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था यावर्षीदेखील होते की काय? याही प्रश्नाने बागायतदारांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहरावर खार पडण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे येथील बागायतदारांना वारंवार कीटकनाशक फवारण्या कराव्या लागल्या आहेत. सध्या मात्र आंबा मोहरावरती खार व कोणत्याही किटकाचा प्रार्दुभाव दिसून येत नाही. मात्र, मोहरावरती फळधारणाच होत नसल्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत.
आंबा पीक टिकवण्यासाठी कसोटीच
बदलत्या वातावरणामध्ये आंबा पीक टिकवणे ही आंबा बागायतदारांसमोर फार मोठी कसोटीच निर्माण झाली आहे. तरीसुद्धा कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन येथील बागायतदार आत्मनिर्भरपणे आंब्याची मशागत करत आहेत. कोरोना विषाणूच्या काळात वाशी मार्केटमध्ये जाणारा आंबा बंद झाला होता. अशा परिस्थितीमध्ये येथील छोट्या-मोठ्या बागायतदारांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या मालाची स्वतःच विक्री करून राज्यातील मोठमोठ्या शहरांतील ग्राहकांशी संपर्क साधून आंबा विक्री केली आणि दलाली संपुष्टात आणण्याची यावेळी सुरुवात झाली.
बागायतदार बनले आत्मनिर्भर
आजही आत्मनिर्भर बनलेले देवगडचे आंबा बागायतदार वाशी मार्केटवर अवलंबून न राहता बहुतांश प्रमाणात स्वतःच्या मालाची स्वतःच विक्री करून आंबा पेटीला चांगला भावदेखील मिळवत आहेत. अशाचप्रकारे बदलत्या वातावरणामध्येही आंबा पीक टिकवण्यासाठी येथील बागायतदार वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी होत आहेत. सध्या तालुक्यात आंबा कलमांवर आलेल्या मोहराला (कणी) फळधारणा कमी प्रमाणात होत आहे. यावरही मायक्रोनुटन औषधांची फवारणी करून फळधारणा होण्यासाठी प्रवल करत आहेत.
अधिक वाचा: Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?