धाराशिव : आपल्या द्राक्षांनी जगाच्या कानाकोपऱ्यात डंका पिटल्यानंतर आता पाठोपाठ आंबाही (Mango) सज्ज झाला आहे. धाराशिवच्या मातीतून उपजलेल्या केशरचा गोडवा जगातील आंबाप्रेमीच्या जिभेवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.
यावर्षी निर्यातीसाठी (Export) महाराष्ट्रातून (Maharashtra) सर्वाधिक नोंदणी धाराशिव (Dharashiva) जिल्ह्यातून झाली आहे. त्यामुळे कोकणानंतर मराठवाडा अन् त्यातही धाराशिव आता 'मँगो हब' (Mango Hub) बनण्याच्या मार्गावर असल्याची प्रचिती येत आहे.
हवा, पाणी अन् तुळजाभवानी असा कधी गमतीने तर कधी उपहासाने धाराशिवचा उल्लेख आजही होतो. मात्र, हे चित्र नजीकच्या काळात बदलताना दिसत आहे. येथील शेतकऱ्यांनी जिद्द अन् प्रयोगशीलतेतून धाराशिवची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या दर्जेदार उत्पादनातून युरोपीय देशांत (European Countries) धाराशिवच्या द्राक्षाने (Grapes) पत तयार केली आहे. यापाठोपाठ आता केशर आंबाही जगातील विविध देशांमध्ये आपली मोहिनी घालेल, यात शंका असण्याचे कारण नाही.
युरोपीय देशांमध्ये आंबा निर्यातीसाठी मँगो नेट (Mango Net) या ऑनलाईन प्रणालीद्वारे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. या नोंदणीत सध्या धाराशिव केशर आंब्यासाठी महाराष्ट्रातून अव्वल राहिला आहे.
आता आंबा निर्यातीसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची नोंदणी करुन निर्यातीद्वारे शेतकऱ्यांना दीड ते दोनपट दर मिळविता येणार असल्याने यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. मागील ५ वर्षात धाराशिव जिल्ह्यात आंब्याचे सातशे पटीने क्षेत्र वाढले.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीद्वारे चांगले दर मिळवून घेण्यासाठी मँगो नेटवरील नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना ५ वर्षे मुदतीचे प्रमाणपत्र मिळते. जे निर्यातीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी. - रविंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
३१ मार्चपर्यंत करता येणार मँगो नेटवर नोंदणी
२०२० साली आंबा निर्यातीसाठी केवळ ७ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील १४.४२ हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली होती. या क्षेत्रात पुढे वाढ होत जाऊन २०२४ मध्ये सुमारे सातशे पटीहून अधिक म्हणजेच १ हजार ९५ हेक्टरची नोंदणी १ हजार १३४ शेतकऱ्यांनी केली.
अशी झाली नोंदणी
साल | नोंदणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) |
२०२० | १४.४२ |
२०२१ | ४०.५६ |
२०२२ | १७.३८ |
२०२३ | ४९.८२ |
२०२४ | १०.९५ |