Join us

सेंद्रिय शेती करायचीय, ही योजना तुमच्यासाठी, असं मिळवा अनुदान 

By गोकुळ पवार | Published: December 09, 2023 3:32 PM

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देण्यात येत आहे.

शेतीमध्ये सातत्याने होत असलेल्या रसायनाचा अतिरिक्त वापर यामुळे जमिनीचा पोत खालवलेला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होत चालल्या आहेत. रासायनिक किडनाशके /औषधेयांच्या वापरामुळे जमीन व पाणी दुषीत होत आहे. एकुणच शाश्वत कृषि उत्पादनासाठी नैसर्गिक/सेंद्रिय शेती हा पर्याय आहे. या दृष्टीने राज्यात नैसर्गिक/सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता डाँ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेला सन 2022-23 ते सन 2027-28 या कालावधी करिता मुदतवाढ देऊन मिशनची व्याप्ती राज्यभर वाढविण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. मिशनच्या नावात बदल करुन डाँ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असे नामकरण करण्यात आलेले आहे.

डाँ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर थांबवुन जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवुन जमिनिची सुपिकता व आरोग्य सुधारणे. रसायनमुक्त सुरक्षित,सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्यसाखळी विकसित करणे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे आणि कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे. समुह संकल्पनेद्वारे जिल्हयात 50 हेक्टर क्षेत्राचे तीन वर्षात 570  उत्पादक गटांची स्थापना करणे आणि  गटांचे समुह तयार करुन 57 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे. शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्याच्या स्तरावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करुन स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे.

शेतकऱ्यांची निवड कशी केली जाते?   यापूर्वीच सेंद्रिय शेतीबद्दल जागृत असलेले शेतकरी. सेंद्रिय शेतीमध्ये पुर्वीपासुन अवलंब करणारे शेतकरी. सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होणारे शेतकरी. सेंद्रिय शेती अंतर्गत प्रमाणिकरणासाठी आवश्यक शेती पध्दतीचा स्वच्छेने अवलंब करणारे शेतकरी. सेंद्रिय शेतीबाबत प्रशिक्षण घेऊन योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील त्या त्या जिल्ह्यातील या प्रवार्गांच्या शेतकऱ्यांच्या प्रमाणात शेतकऱ्यांची निवड. महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देवून किमान 30 टक्के पर्यंत महिलांचा योजनेत निवड करावी. प्रती शेतकरी दोन हेक्टर च्या मर्यादेत अनुदान देय राहील .

गावांची/समूहाची निवड व गटाची स्थापना 

सेंद्रिय शेतीबाबत निकष व अटी पळून योजनेत सहभागी होण्यास इच्छुक शेतकऱ्यांची संख्या अधिक असलेल्या गावांची निवड प्राधान्याने करावी(शक्यतो एका गावात किमान एक गट स्थापण्यास पुरेशी शेतकरी संख्या असावी). एका गावात किमान एक गट स्थापण्यास पुरेसे शेतकरी उपलब्ध न झाल्यास शेजारच्या गावातील शक्यतो सलग शिवारातील शेतकरी निवडून गटांची  स्थापना करावी. निवडलेल्या गावात किमान एक किंवा त्याहून अधिक गट स्थापन करता येतील. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत नोंदणीकृत गटांना या योजनेत सहभाग घेता येईल. प्रत्येकी गटाचे क्षेत्र 50 हेक्टर असावेत. (गट स्थापन करताना कोकण विभागात किमान 10 हेक्टरचा एक गट आणि उर्वरीत महाराष्ट्रात किमान 25 हेक्टरचा एक याप्रमाणे गटांची स्थापना करावी.) नव्याने स्थापन होणाऱ्या 50 हेक्टर क्षेत्राच्या गटाची कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यंत्रणेकडे नोंदणी करावी.

असं मिळणार अनुदान 

नैसर्गिक सेंद्रिय शेती-क्षेत्र विस्तार व शेतकरी प्रशिक्षण     70 हजार रुपये. नैसर्गिक / सेंद्रिय प्रमाणिकरण 5 लाख रुपये. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्यांचे प्रशिक्षण 1 लाख रुपये शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र 5 लाख रुपये शेतकरी गट स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र  2 लाख  रुपये शेतकरी उत्पादक कंपन्यांना पणन सुविधेसाठी अर्थसहाय्य 5 लाख रुपये कृषि विज्ञान केंद्रामार्फत कल्चर निर्मिती केंद्र, प्रात्यक्षिक, कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण  (45 केव्हीके) 25 लाख रुपये. 

टॅग्स :शेतीसेंद्रिय शेतीशेतकरी