Join us

हिरवळीच्या खतांनी समृद्ध करा मातीचे आरोग्य

By बिभिषण बागल | Published: August 30, 2023 9:22 PM

सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत वापरणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच शेतकरी मातीचे परीक्षण करत नाहीयेत आणि खताची मात्रा आपल्याला वाटेल त्या पद्धतीने देतात म्हणजे खताची मात्रा जास्त प्रमाणात देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खतावर होणारा खर्च हा वाढत आहे. जमिनीचा पोत चांगला ठेवायचा असेल आणि जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून आपल्याला पुढच्या पिढीला आपली जमीन द्यायची असेल तर आपण जमिनीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत वापरणे गरजेचे आहे. 

सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा महत्वाचा गुणधर्म आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये १ टक्केपेक्षा सेंद्रिय कर्बची पातळी राखणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी झाल्याने पीक उत्पादनक्षमता कमी होते आणि त्याचा अनिष्ट परिणाम होवून शेतकऱ्यांचे अप्रत्यक्षरित्या अधिक नुकसान होते. जमिनीची उत्पादकता आणि सुपिकता टिकविण्यासाठी प्रामुख्याने जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळी पूर्वमशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यामध्ये माती परिक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते व जीवाणू खतांचा वापर करावा.

जमिनीची उत्पादकता व सुपिकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण या खतांमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात चांगली वाढ होते, भौतिक गुणधर्मात प्रामुख्याने बदल होतो, त्यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य व हवा खेळती राहते, जमिनीची धुप कमी होवून जलधारणशक्ती वाढते. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य-अखाद्य पेंढी, गांडूळ खत इत्यादीचा समावेश होतो.

मात्र सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतू आपण त्याप्रमाणात देवू शकत नाही. कारण या खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपिकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहे. हिरवळीचे खत हे इतर शेणखत व कंपोस्टखत यांना पर्याय ठरु शकत नाही. आजच्या काळामध्ये सेंद्रिय खतांच्या किंमती व रासायनिक खतांच्या किंमती वाढलेल्या आहेत. खतावरील खर्च कमी करण्यासाठी हिरवळीच्या खतांची मदत होते.

हिरवळीचे खत जमिनीमध्ये वनस्पतींची हिरवी पाने किंवा जमिनीमध्ये हिरवी पिके वाढवून पीक फुलोऱ्यात असतांना त्याच जमिनीमध्ये नांगरणीच्या सहाय्याने गाडतात. या पध्दतीस हिरवळीचे खत असे म्हणतात.

हिरवळीचे खते देणारी पिके१) ताग:- ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे. ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे. सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही. तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.- पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे. पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से.मी. उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे. तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.

२) धैंचा:- तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी पर्जन्यमान, पाणथळ, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत हे पिक तग धरु शकते. या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.- या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे. बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से.मी उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे.- या काळात धैंच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ टक्के इतके आहे. भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.

३) घेवडा: हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते. पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही. पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियाणे पेरावे. नंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ते जमिनीत गाडावे.

४) सेंजी: रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३०-४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी. जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते. ऊसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे.

५) द्विदल कडधान्याची पिके:पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग, चवळी, उडीद, कुळीथ, गवार यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतास चांगला उपयोग होतो. जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग, उडीद, कुळीथ यासाठी २५ ते ३० कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि.ग्रॅ. नत्र पिकास उपल्ब्ध होतो.

६) गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया):- झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते. या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात. पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से.मी लांब ३ से.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३०x३०x३० से.मी आकाराचा खड्डा करून लागवड करावी.दुसऱ्या पध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे. ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुसऱ्या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो. या झाडाच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.गिरीपुष्पाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते. सेंद्रिय कर्ब ३६ टक्के, नत्र २.७० टक्के, स्फूरद ०.५ टक्के व पालाश १.१५ टक्के आहे म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे.

हिरवळीच्या खताचे फायदे:- हिरवळीच्या खताचा मध्ये ह्यूमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातिला काळा रंग येतो.हिरवळीच्या खताचा मधील सेंद्रिय द्रव्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्य रासायनिक क्रियने विरघळुन ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.लवकर कुजणारे हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्पुरदचे प्रमाण आणि अॅझोटोबॅक्‍टर सारख्या जिवाणूंचे प्रमाण वाढते.जमिनीत टिकून राहणाऱ्या कण समूहांचे प्रमाण वाढते.जमिनीच्या जलधारण क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.सेंद्रिय पदार्थामुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून राहता त्याचा निचरा लवकर होतो. हलक्‍या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणी धारण क्षमता वाढते.द्विदल वर्गातील हिरवळीची पिके हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठवले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडल्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.हिरवळीच्या खताचे पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फूरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.

डॉ. दादासाहेब खोगरे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, मदनापुरम वनपर्थी, तेलंगाना9370006598

टॅग्स :खतेसेंद्रिय शेतीपीकपीक व्यवस्थापनशेतकरीपेरणी