Join us

पावसात खंड पडला तरी सोयबीन लागवडीच्या 'या' पद्धतीत पिके धरतात तग; उत्पादनातही होते वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:48 AM

पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आहे. Soybean Cultivation

पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता दरवर्षी आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. भोकरदन तालुक्यात यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आहे.

त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यासोबत पावसाच्या खंडातदेखील पिके चांगली येण्यास मदत होईल. शिवाय उत्पादनात दीडपट वाढ होईल, असा विश्वास कृषी खात्याने व्यक्त केला आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करतात. यंदा देखील शेतकऱ्यांनी २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला कधी अतिवृष्टी, तर कधी कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात घट होत आहे.

शेतकरी मागील वर्षभरापासून कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन लागवडीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात पट्टा पद्धतीने सोयाबीनची पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे.

लागवडीपासून ते काढणीपर्यंत खर्चाची बचत होणार

यंदा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी बीबीएफ, बेडवर, तर पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे. यंदा शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टरवर पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे. शिवाय लागवडीपासून ते काढणीपर्यंत खर्चाची बचत शेतकऱ्यांची होणार आहे.

आता सोयाबीन जोमात

• सात एकर पट्टा पद्धतीने लागवड केली. मी दरवर्षी जुन्या पद्धतीने सोयाबीन लागवड करीत होतो. मात्र, यंदा मी कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ सात एकरवर पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड केली आहे. याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होणार आहे. आता सोयाबीन देखील जोमात आहे. - कृष्णा पवार, शेतकरी, शेलूद.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळणार

दरम्यान, पावसाचा खंड पडला तरी हे पिके तग धरू शकणार असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. तालुक्यात यंदा पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने खरिपातील पेरणी वेळेवर झाली आहे. अनेक ठिकाणी पेरणीनंतर पावसाने ओढ दिली. मात्र, अशा परिस्थितीत पट्टा पद्धतीने सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना यावेळी फायदा झाला. जेमतेम पावसावरच पिके सध्या तग धरून आहेत.

पिकांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा

पावसाळा सुरू होऊन दीड महिने उलटले असले तरी अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने परिसरातील सर्वच जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. पिकांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर याचा परिणाम निश्चित शेती उत्पादनावर होणार आहे. सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांवर विविध रोग पडले आहेत. त्यामुळे शेतकरी औषधी फवारणी करताना शेतशिवारात दिसत आहेत.

पिकांवर बुरशीजन्य रोगाची लागण

तालुक्यात २३ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली. यापैकी पाच हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीने पेरणी केली आहे. अशा शेतकऱ्यांचे दीडपट उत्पादन वाढू शकते.

सततच्या पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार फवारणी घ्यावी. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी.

हेही वाचा : जुने दस्तऐवज आता केवळ एका क्लिकवर; भूमीअभिलेखचे झाले आधुनिकीकरण

टॅग्स :सोयाबीनलागवड, मशागतपीक व्यवस्थापनजालनाभोकरदनशेतकरीशेतीशेती क्षेत्र