पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी २०२४-२०२५ साठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. आंबा पिकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा पिकविमा योजनेचा हप्ता ३० नोव्हेंबर पूर्वी बँक किंवा विकास सोसायटी सेवा, सीएससी केंद्र व पिकविमा पोर्टल वरती भरावा.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये• गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता लागू• ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याचे अतिरिक्त विमा संरक्षण घ्यायचे आहे त्यांनी मूळ हवामान धोक्यासहित फक्त बँकेमार्फत विमा प्रस्ताव सादर करणे अनिवार्य.• सर्व शेतकऱ्यांनी अधिसूचित हवामान धोके विचारात घेऊन विमा करावा.• कोकण विभागाकरिता प्रति शेतकरी एका फळपिका खोलीत किमान दहा गुंठे (०.१० हे.) क्षेत्राचा व उर्वरित विभागांसाठी प्रति शेतकरी एका फळपिका खालील किमान वीस गुंठे (०.२० हे.) क्षेत्राचा विमा करणे बंधनकारक.• भाडेपट्टी कराराने शेतीवरील फळपिकांचा विमा-नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेपट्टी करार अनिवार्य.• अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळपिकासाठी व एका वर्षात एकाच क्षेत्रावर कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा (मृग किंवा आंबिया बहार) घेता येईल.• विमा सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हे पर्यंत मर्यादित.• ई-पीक पाहणी अनिवार्य, बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.• विमा संरक्षण केवळ उत्पादनक्षम फळबागानांच लागू राहील.
अधिक वाचा: कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना