Join us

Orchard Technique : शेतकऱ्यांनी फळबाशेतकऱ्यांनी फळबाग तंत्र आत्मसात करावे -  डॉ. बी. एम. कापसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 11:35 AM

Orchard Technique : शेतकऱ्यांनी आता फळबाग तंत्र आत्मसात करुन गट शेती करण्यासाठी वळले पाहिजे.

शेतकऱ्यांनी आता फळबाग तंत्र आत्मसात करुन गट शेती करण्यासाठी वळले तरच शेतकऱ्यांची उन्नती होऊ शकते, असे मत डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले. नुकताच मोजे पालोदक, तालुका सिल्लोड येथे गट शेती संघाचा २०३७ वा गट शेती मेळावा उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमात गट शेती प्रणेते तथा फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी गट शेती बाबत तसेच आंबा लागवडी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सिल्लोड तालुक्यात जाफराबाद तालुक्याप्रमाणे गट शेती मोठ्या प्रमाणात वाढावी, यासाठी हवी ती मदत करण्यास तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.  

शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी विशेषतः फळबागेमध्ये आंबा लागवड करतांना अति घन लागवड पद्धतीने करावी. अशी लागवड करायची असल्यास त्यास लागणारी जमीन, पाणी, कलमाची निवड तसेच अगदी छाटणी आणि काढणीपर्यंतचे सविस्तर तंत्र त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनव्दारे माहिती दिली.

सिल्लोड तालुक्यात सिंचनाची चांगली सोय असल्यामुळे या भागात आंबा अति उत्कृष्ट येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आपण जी हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात घेतो ती जर गट पद्धतीने घेतल्यास त्यासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शक आणून देशातील सर्वात मोठे निर्यातदार म्हणून सिल्लोड तालुका हा  खास निर्यातीचे हब बनवू शकतो.

कार्यक्रमाच्या उ़द्धटनप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी आपण या भागात गट शेतीतून आंबा करणार तसेच मिरची घेणार असाल तर कृषी खात्यातर्फे आपणास संपूर्ण मदत करण्यात येईल. कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा आढावा घेतला जाईल. 

यावेळी कापूस लागवडीबाबत मार्गदर्शन करताना कापूस तज्ञ प्राचार्य डॉ.एस.एस. बैनाडे यांनी खत, पाण्याचे नियोजन तसेच सेंद्रिय बोंड आळीचे नियंत्रणाबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

कापूस तज्ञ डॉ.एस.एस.माने यांनी कापसाच्या विविध वाणाविषयी सादरीकरणातून मार्गदर्शन केले. नंतर देळेगव्हाणचे गटप्रमुख भगवान बनकर यांनी गट शेती संघाची आतापर्यंतची झालेली वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली. 

यावेळी उदय देवळाणकर यांनी शेतकऱ्यांनी एकजुटीने मिरची व इतर पिके घेऊन आधुनिक तंत्राचा वापर करुन शेती केल्यास आपणास चांगले अर्थार्जन होऊ शकते, याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी माजी डी.डी.आर.देविदास पालोदकर यांनी आपल्या पालोद गावासाठी हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संजय दांडगे यांच्या अंबाबागेत शिवार फेरी काढण्यात आली. शिवार फेरीच्या माध्यमातून जमीन आणि पाणी यांचा झाडावर झालेला परिणाम तसेच झाडाची छाटणी, आच्छादन पिक संरक्षण याविषयी डॉ. भगवानराव कापसे यांनी शेतात सविस्तर मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी आघाव, तालुका कृषी अधिकारी बरदे तसेच भाऊराव दरेकर, भाऊराव आटपळे, भगवानराव बनकर कर्टुलेवाले, जानकीराम टेलर, राजेंद्र घोडके,  शेख सईद, ज्ञानेश्वर मिसाळ, पालोदे, बुलढाण्याहून पारवे  आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पालोद तसेच पालोदचे उपसरपंच मच्छिंद्रनाथ पालोदकर, गणेश पालोदकर व इतर गावातील मंडळींनी केले होते.  तुषार पालकर यांनी आभार प्रदर्शन केले. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीआंबा