Join us

शेतकऱ्यांनो विहरीतील पाणी पिण्याआधी 'या' घरगुती पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती वापरा अन् आरोग्य जपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:39 IST

शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी पिणे ही कोणत्याही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. मात्र आजही आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शेतकरी कुटुंबांमध्ये पाण्याच्या शुद्धतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शेतातील विहिरीतील पाणी मातीच्या मटक्यांमध्ये ठेवून थंड करून तेच पाणी थेट प्यायला घेतले जाते.

शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायीपाणी पिणे ही कोणत्याही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. मात्र आजही आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये विशेषतः शेतकरी कुटुंबांमध्ये पाण्याच्या शुद्धतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शेतातील विहिरीतील पाणी मातीच्या मटक्यांमध्ये ठेवून थंड करून तेच पाणी थेट प्यायला घेतले जाते.

मटका पाणी थंड करतो, पण त्यामधील सूक्ष्म जंतूंना नष्ट करत नाही. परिणामी, शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध पाण्याद्वारे होणाऱ्या आजारांना बळी पडतात. आज याच अनुषंगाने आपण शुद्ध पाणी पिणे का आवश्यक आहे? त्याचे फायदे तसेच पाणी शुद्धीकरणाच्या घरगुती आणि यांत्रिक पद्धती व पाण्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी माहिती पाहणार आहोत.

शुद्ध पाणी पिण्याचे फायदे

आरोग्य टिकते - शुद्ध पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजार टाळता येतात.

• पचन सुधारते - स्वच्छ पाणी पचायला हलके असते आणि पचनक्रियेला मदतगार आहे. 

• त्वचेचे आरोग्य राखते - अशुद्ध पाण्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज, आणि संक्रमण होऊ शकते. शुद्ध पाणी त्वचेला निरोगी ठेवते.

• रोगप्रतिकारक शक्ती वाढते - दूषित पाणी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करते, तर स्वच्छ पाणी शरीर बळकट करते.

• मुलांसाठी अत्यंत आवश्यक - लहान मुलांचे शरीर नाजूक असते. अशुद्ध पाणी त्यांच्यासाठी अधिक घातक ठरू शकते.

पाण्यामुळे होणारे सामान्य आजार

• अतिसार (Diarrhea) / हगवण (Dysentery)• टायफॉईड (Typhoid)• कॉलरा (Cholera)• पीलिया (Hepatitis A, E)• विषबाधा (Waterborne poisoning)

अन्य बुरशीजन्य / जंतुसंसर्ग

• त्वचेचे आजार• डोळ्यांचे संक्रमण• पायाच्या बोटांमधील जंतुसंसर्ग

पाणी शुद्धीकरणाच्या कमी खर्चातील घरगुती पद्धती

• उकळणे (Boiling) : पाणी उकळणे ही सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. पाणी १० ते १५ मिनिटे उकळल्यास त्यातील ९०% पेक्षा जास्त सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. नंतर हे पाणी थंड करून झाकण असलेल्या स्वच्छ भांड्यात साठवावे.

• सूर्यप्रकाशात ठेवणे (Solar Disinfection) : पाणी स्वच्छ प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून ६-८ तास सूर्यप्रकाशात ठेवल्यास त्यातील अनेक जंतू नष्ट होतात. ही पद्धत देखील कमी खर्चिक आहे.

• कापड गाळणी (Cloth Filtration) : पाणी कपड्याच्या चार थरांच्या गाळणीद्वारे गाळल्यास त्यातील घनद्रव्ये थांबतात. यामुळे प्राथमिक शुद्धीकरण होते, पण ही पद्धत जंतू नष्ट करत नाही हेही विशेष.

• तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणे : तांब्याच्या भांड्यात रात्री ठेवलेले पाणी सकाळी पिणे फायदेशीर असते. तांब्यातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म काही प्रमाणात पाणी शुद्ध करू शकतात.

पाणी शुद्धीकरणाच्या मध्यम खर्चातील तसेच अत्याधुनिक यांत्रिक प्रक्रिया

संड फिल्टर (Sand Filter) : रेती, कोळसा आणि दगडांच्या थरांचा वापर करून पाणी गाळले जाते. हे जास्त स्वच्छतेसाठी फायदेशीर असते.

RO (Reverse Osmosis) : या पद्धतीत पाणी उच्च दाबाने गाळून त्यातील घातक क्षार, जंतू, विषारी घटक वेगळे केले जातात. खूप स्वच्छ पाणी मिळते, पण ही प्रक्रिया खर्चिक असते.

UV फिल्टर : पाण्यावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करून जीवाणू मारले जातात. RO पेक्षा थोडी कमी खर्चिक पद्धत.

UF (Ultrafiltration) : सदरील प्रक्रिया RO आणि UV पेक्षा वेगळी असून त्यात सूक्ष्म छिद्रांमधून पाणी गाळले जाते. ही पद्धत जंतू गाळण्यास उपयुक्त आहे.

अशा विविध प्रकारे पाणी स्वच्छ करत शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत पाण्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आर्थिक परिस्थितीनुसार जर आपल्याकडे सुविधा कमी असतील तर घरगुती उपायांनीही आपण खूप काही साध्य करू शकतो. आज शुद्ध पाणी प्याल, तर उद्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज कमी होईल!

हेही वाचा : शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपल

टॅग्स :पाणीशेतकरीशेती क्षेत्रआरोग्यहेल्थ टिप्स