कोल्हापूर जिल्ह्यातील बैलांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली असून, त्याला यांत्रिकीकरण कारणीभूत आहे. त्याचबरोबर बैलांच्या दरात झालेली वाढ आणि त्यांचे सांभाळणे अडचणीचे ठरू लागल्यानेच अलीकडे दोन बैल सांभाळण्यापेक्षा ट्रॅक्टर परवडला, अशी मानसिकता शेतकऱ्यांची होऊ लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बैलजोडीद्वारेच शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती मात्र, कालांतराने ही संख्या कमी होत गेली. त्याला अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे वाढलेला दूध व्यवसाय, दूध व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला पैसे मिळू लागल्याने बैल संगोपनाकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा करण्यास सुरुवात केली. काळानुरूप कुटुंबातील शेतीचे तुकडे पडत गेल्याने अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी बैल सांभाळायचे म्हटले तर तेही परवडत नाहीत.
बैलाच्या जातीवर ठरतात दर
बैलाच्या जातीवर त्याचे दर ठरतात. शर्यतींच्या बैलांचे दर वेगळे आहेत. मशागतीसाठीच्या खिलार बैलजोडीचे दर लाखापासून अडीच लाखांपर्यंत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात बैलांचे मोठे आठवडी बाजार मुरगूड व पेठ वडगाव येथे भरतात. येथे साधी बैलजोडीची किंमत लाखाच्या पुढे गेली आहे. खिलार जोडीची किंमत दीड ते पावणेदोन लाख रुपये आहे. पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे सोमवारी आठवडी बाजारात या बैलजोडीची किंमत दीड लाखाच्या पुढे गेली होती.
लहान ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ
अल्पभूधारक शेतकरी स्वतःच्या मशागतीसाठी लहान रोटाव्हेटर घेत आहेत. त्यातून भाडे मिळाले तर तेही करता येते. मशागत म्हणून लहान ट्रॅक्टरकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे.
बैलापेक्षा ट्रॅक्टरची मशागत परवडते भाड्याने बैलांकडून मशागत करून घ्यायची म्हटले तर दिवसाला १२०० रुपये मोजावे लागतात. यामध्ये जेमतेम दहा ते पंधरा गुंठे जमिनीची मशागत होते. त्याऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागत केली तर वेळेत व त्यापेक्षा कमी खर्चात होते.
- प्रकाश कांबळे, शेतकरी
शेतीसाठी बैलांचा वापर करण्याचे प्रमाण खूप कमी झाले असून, आगामी काळात ही पद्धती कालबाह्य होणार आहे.
(जनावरांचे व्यापारी, मिरज)