शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. सततच्या दुष्काळी स्थिती, आर्थिक अडचणी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे.
यामुळे ही गंभीर समस्या लक्षात घेऊन डॉ. लक्ष्मीकांत पायमल्ले यांनी आपल्या संशोधनातून यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. "रासायनिक कीटकनाशकाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे शेतकऱ्यांमध्ये येणाऱ्या नैराश्यात 'अपराजिता' या द्रव्याच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन' या विषयावर विद्यापीठात संशोधन प्रबंध सादर केला आहे.
संशोधनानुसार काही कीटकनाशकांमध्ये उपस्थित असलेले रासायनिक घटक दीर्घकाळ शेतकऱ्यांच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो आणि त्यामुळे नैराश्याची लक्षणे दिसून येतात आणि नैराश्याच्या अवस्थेत ते आत्महत्येचा विचार करतात.
'अपराजिता' द्रव्याचा सकारात्मक परिणाम
• प्रा. पायमल्ले यांच्या संशोधनात 'अपराजिता' या वनस्पतीजन्य द्रव्याचा उपयोग नैराश्य दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो, असे सिद्ध झाले आहे.
• हे द्रव्य नैसर्गिक असून शरीरातील ताण कमी करण्यास आणि मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास मदत करते.
• प्रयोगादरम्यान असे आढळून आले की, 'अपराजिता' सेवन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मानसिक स्थैर्य निर्माण झाले आहे.
• नैसर्गिक उपायांचा शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
एक नवा दिशादर्शक मार्ग
या संशोधनाच्या आधारे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य दूर करण्यासाठी 'अपराजिता'चा उपयोग प्रभावी ठरू शकतो. प्रा. पायमल्ले यांच्या संशोधनाने शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने एक नवा दिशादर्शक मार्ग दिला आहे. शेतकऱ्यांसाठी हे संशोधन एक नवीन आशेचा किरण ठरू शकते.
हेही वाचा : विविध आजारांवर वरदान ठरणारी 'सुपर फूड' ज्वारी खायलाच हवी