Join us

Government Scheme : ग्रामीण उद्योजिकांना विश्वकर्मा योजनेची भरारी; उद्योजक क्षेत्रात प्रोत्साहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:43 AM

महाराष्ट्राची उद्योगभरारी कार्यक्रमात विश्वकर्मा योजनेतील महिलांना ३० हजार किट वाटप करण्यात आले.  यातून महिलांना उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार आहे. (Government Scheme)

Government Scheme : 

अमरावती :  उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

शुक्रवारी(२८ सप्टेंबर) रोजी महाराष्ट्राची उद्योगभरारी कार्यक्रम शहरात पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर आदी उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा योजनेतील महिलांना ३० हजार किट वाटप करण्यात आले. 

ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना अमरावती जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. या योजनेत ५० हजारच्या जवळपास नोंदणी झाली. यातील ३० हजार लाभार्थीना किटचे वाटप करण्यात आले. 

दोन वर्षांत ३५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण पातळीवरील रोजगारासह मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्य करीत आहे. राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिल्या जाणार नाही. त्यासोबतच गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात स्टील क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 

येत्या एक वर्षात येथील चित्र बदलेले असेल. संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच. त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो.लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे. विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची नांदी आहे. कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

माहिती न देणाऱ्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना देऊ नोटीस

जिल्ह्यातील नवनवीन आलेले उद्योग तसेच आलेल्या कंपन्यांविषयी एमआयडीसीचे आरओ माहिती देत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्रकारांनी केली. यावेळी संबधित आरओ यांनी असे करू नये, त्यांनी जे काही चांगली किंवा वाईट असेल ती माहिती माध्यमांना द्यायला हवी. दर आठवड्याला एमआयडीसीमध्ये घडणाऱ्या घडामोडींची माहिती देण्याची नोटीस आरओंना देणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलामहिला आणि बालविकासव्यवसायसरकारी योजना