Join us

Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:29 AM

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे.

संजयकुमार चव्हाणमांजर्डे : जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे.

तासगाव, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यातून युरोप व दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात. नैसर्गिक आपत्तीवर मात करत द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष बागा चांगल्या पद्धतीने तयार करतो.

द्राक्ष हे महत्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाळ टिकणारे फळ आहे. त्याचा उपयोग मुख्यतः तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे) वापरतात.

दुसऱ्या प्रकारात द्राक्षांवर प्रक्रिया करून बेदाणा तयार करून खाण्यासाठी वापरतात तिसऱ्या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो.

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. प्रामुख्याने सोनाक्का, एस एस एन, आर के, सुपर सोनाक्का, माणिक चमन या जातीची द्राक्षे परदेशात निर्यात केली जातात.

निर्यातक्षम द्राक्षांचा त्याच्या प्रतवारीनसार दर ८० ते १२० दर प्रति किलो असतो. एकरी १२ ते १६ टन उत्पादन घेतले जाते. एकरी उत्पन्न १० ते १४ लाख रुपये तर एकरी मजुरी, खते, औषधे, फवारणी खर्च ३ ते ४ लाखांपर्यंत होतो.

द्राक्ष वेलीच्या ऑक्टोबर छाटणीला अत्यंत महत्त्व आहे. ऑक्टोबर छाटणीनंतरचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करताना पाणीव्यवस्थापन, खताचे डोस औषध फवारणी अचूक वेळेत करणे आवश्यक असते.

द्राक्ष वेलीचे माती, पाणी व देठ निरीक्षण मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करून घेतल्यास उपलब्ध आणि कमतरता असलेले अन्नद्रव्यांची पूर्व कल्पना येते व त्यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करता येते. माती परीक्षण करून त्याप्रमाणे खत व्यवस्थापन करावे.

जानेवारीच्या सुरुवातीपासून युरोपियन व इतर देशात निर्यातीस सरुवात होते. जानेवारीपासून जिल्ह्यातील द्राक्ष युरोपियन देशातील बाजारपेठेत पोहोचण्यास सुरुवात होते. हा कालावधी महत्त्वाचा असतो.

प्रगतशील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक स्वयंचलित 'वेदर स्टेशन' हवामान केंद्राची बागेत उभारणी केली आहे. त्याद्वारे उपलब्ध हवामान घटकांच्या तपशिलाच्या आधारे पीक व्यवस्थापन, या तंत्रज्ञानात ११ सेन्सर्सचा वापर, यामध्ये मुळांच्या कक्षेभोवती ओलावा, मातीचे व हवेचे तापमान, हवेतील आर्द्रता, हवेचा दाब, वेग व दिशा, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाश तीव्रता आदी बाबी मोजता येतात. जिल्ह्यातून यंदा १३६८ कंटेनरमधून १८ हजार ७७१ मेट्रिक टन द्राक्षे निर्यात चीन, रशिया, नेदरलँड, नार्वे, दुबई, सिंगापूर, तैवान इत्यादी देशात पाठवली आहेत. - भाऊसाहेब एरंडोले, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डसांगलीतासगाव-कवठेमहांकाळमिरजहवामानआंतरराष्ट्रीयफळेफलोत्पादन