Join us

शेती मातीची आवड असेल तर कृषी क्षेत्राच्या या शैक्षणिक संधी सोडू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 1:11 PM

कृषी क्षेत्रातील शिक्षणाच्या अपरिचित वाटा..

भारत हा कृषिप्रधान देश असून ५५ % देशाची लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी या क्षेत्राचा १५ ते १६ टक्के वाटा आहे. देशाच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कृषि महत्त्वाचे क्षेत्र आहे. अनेक उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल हा शेती मधूनच पिकवला जातो.

देशाची अर्थव्यवस्था आणि विकास दर हा शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. तसेच या क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी भारतातील शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी युवकांना कृषीविषयक शिक्षण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

कृषी शिक्षणाची आवड

ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांकरिता इयत्ता दहावी नंतर कृषी शिक्षणाकरिता पदविका अभ्यासक्रम हा महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन चा दोन वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त बीएससी (कृषी) पदवी अभ्यासक्रमाच्या (चार वर्ष) प्रवेशासाठी पात्रता बारावी विज्ञान शाखेतून (PCMB, PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच  MHT-CET, JEE, NEET सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे देखील यासाठी गरजेचे आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व सीईटी सेल मुंबई हे सदरील प्रवेश प्रक्रिया रबवितात. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी शाखेशी निगडित बीएससी ऍग्री, बीएससी हॉर्टी, बीएससी फॉरेस्ट, बी टेक फूड टेक, बी टेक कृषी अभियांत्रिकी, होम सायन्स इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार प्रवेश घेऊ शकतो.

पदव्युत्तर पदवी करिता ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावयाचे असेल त्यांना आयसीएआर/एमसीएईआर मार्फत होणाऱ्या सीईटी व त्यांनी चार वर्षे कृषि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल किंवा समतुल्य अभ्यासक्रम मिळून त्यांना गुणाानुक्रमे त्यांची निवड पदवीत्तर पदवी च्या विविध शाखेत अभ्यासक्रमाकरिता प्रवेश होतो. 

पुढे आचार्य पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचे असल्यास त्याचे ज्या विषयात एमएससी कृषी केली असेल त्या विषयात ICAR/MCAER मार्फत होणारी सीईटी परीक्षा देऊन गुणाानुक्रमे त्याला उपलब्ध असलेल्या आचार्य पदवीचे जागेवर त्याची निवड होते.

कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

कृषी पदवी (शासकीय नोकरी) : केंद्र शासनामार्फत होणारे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास पदवी झालेला विद्यार्थी पात्र ठरतो. केंद्रीय लोकसेवा आयोगामधील महत्वपूर्ण उदा. IAS, IPS, IFS. इत्यादी या पदावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उच्च पदावर काम करण्याची संधी प्राप्त होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR अंतर्गत विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रावर कृषी पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त होते.

तसेच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कृषी अधिकारी, प्रोफेशनल ऑफिसर, क्लर्क या पदावर IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यास काम करण्याची संधी मिळते. तसेच केंद्र व राज्य शासनांतर्गत कोणत्याही परीक्षेत कृषी पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी पात्रता पूर्ण केलेला विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरी मिळू शकतो.

यासोबतच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, नॅशनल सीड्स लिमिटेड, इफको, नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड इत्यादी भारताच्या कंपन्यात विविध पदावर कार्य करण्याची संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना राज्य शासना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा द्वारे उत्तीर्ण होऊन त्यावरील विविध पदावर काम करण्याची संधी प्राप्त होते.

कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी निघणाऱ्या जाहिरातीमधून कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहायक पदवी, या पदावर काम करण्याची संधी प्राप्त होते. राज्य शासनाच्या जिल्हा परिषदेचे अंतर्गत निघणाऱ्या विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी (सांखिकी), विस्तार अधिकारी पंचायत, कंत्राटी ग्रामसेवक इत्यादी पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते.

खाजगी क्षेत्र : विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्राचा विचार केला तर कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक बियाणे, कीटकनाशके, खते, ठिबक तुषार सिंचन कंपन्या, खाजगी क्षेत्रातील बँक , प्रक्रिया उद्योग, कृषी सल्ला केंद्र, विमा कंपन्यांमध्ये काम करता येते. यासोबत स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरू करता येतो. 

तसेच कृषी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये नवनवीन उपक्रम घेऊन उत्पादन उत्पादकता वाढवून नवीन बदल घडून आणू शकतात. दर्जेदार उत्पादन करण्यासाठी पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. व्यवस्थापना दरम्यान कृषी निविष्ठा, सिंचन, पिकांची मशागत, कृषी अवजारे, अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा प्रकारच्या संलग्न व्यवसाय मध्ये अनेक सेवा संधी दडलेले आहेत.

ग्रामीण भागात युवकांना प्राथमिक प्रक्रिया करण्याची काही यंत्रे विकत घेऊन शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंग करून शेतमाल बाजारात पाठवणे यासारखा उद्योग उभा राहू शकतो. कृषी युवक एकत्र येऊन गट शेती उद्योगातून चांगली संधी प्राप्त होऊ शकते. एका विचाराचे विद्यार्थी एकत्र येऊन एक गट स्थापन करून फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करू शकता व प्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारू शकता..

लेखक प्रा संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापककृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशिक्षणपीक व्यवस्थापनतंत्रज्ञानबाजारग्रामीण विकास