Join us

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास सुरवात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 9:01 AM

Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक २९ जुलै २०२२ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली.

मुंबई : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे.

मात्र, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक २९ जुलै २०२२ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली.

सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये ५० हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे.

या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण २९ लाख २ हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, ४ लाख ९० हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: ८ लाख ४९ हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

पात्र ठरलेल्या १५ लाख ४४ हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी १५ लाख १६ हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी १४ लाख ४० हजार कर्जखात्यांसाठी ५,२२२ कोटी ५ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५,२१६ कोटी ७५ लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

टॅग्स :शेतकरीपीक कर्जपीकसरकारराज्य सरकार