Jaltara Yojana : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) भुजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक गावातील शेतांमध्ये जलतारा(Jaltara) हा उपचार राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी दिल्या आहेत.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना(Farmer) स्वतः च्या शेतजमिनीत पाच चौरस फूट आकाराचा शोषखड्डा खोदावा लागणार असून, या कामाची मजुरी म्हणून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात जलतारा योजना येणार असून, एमआरईजीएस योजनेचे लाभधारक शेतकरी जलतारा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात मंगरुळपीर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
पार्डी ताड सर्कलसाठी ३०० खड्ड्यांचे उद्दिष्ट
जलतारा योजनेंतर्गत जिल्ह्यात किमान १२ हजार ५०० खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. यामध्ये पार्डी ताड सर्कलसाठी ३०० खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
मजुरीपोटी मिळणार ४८०० रुपये!
जलतारा योजनेंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून ४ हजार ८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
कोणाशी कराल संपर्क?
जलतारा योजनेत सहभागी होण्यास इच्छूक शेतकऱ्यांना गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घेता येणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक !
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ, आधार कार्ड आणि एमआरईजीएसचे जॉबकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी जलतारा योजना राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. यामुळे भूजल पातळी वाढविण्यासह विभडीच्या आणि पानथळ जमिनीतील पाणी शोषले जाऊन ती जमीन वहितीयोग्य ठेवण्यासाठी आधार होणार आहे. - सचिन कांबळे, तालुका कृषि अधिकारी, मंगरुळपीर