Jivant Sat-Bara : सातबारावर मृत खातेदारांची नावे कायम असल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहे. यासाठी जिवंत सातबाराची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आता शेतकऱ्यांना जमीन मालक (Farmers land owners) होण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होत आहे. (Jivant Sat-Bara)
यामध्ये तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या गावनिहाय सर्व्हेत १० हजारांवर मृत शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी आता फेरफार प्रक्रिया सुरू झाल्याने मृतांच्या जागी वारसांची नावे चढणार आहेत.(Jivant Sat-Bara)
शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत 'जिवंत' सातबारा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांद्वारा गावनिहाय सर्व्हे करण्यात आला.(Jivant Sat-Bara)
यामध्ये सातबारावरील ९,६१८ खातेदार मृत असल्याचे निदर्शनात आले आहे. या मृतांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार मिळावेत, यासाठी 'जिवंत सातबारा' मोहीम अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांनी सांगितले.(Farmers land owners)
वेळ अन् पैशाची बचत कामेही होतात झटपट
या मोहिमेमुळे मृत खातेदारांच्या वारसाला फेरफारसाठी लागणारा वेळ व पैशाची बचत होत आहे. कमी अवधीत हक्काची शेतजमीन वारसाचे नावे होत असल्याने मोहीम कल्याणकारी ठरत आहे.
मृत खातेदारांची तालुकानिहाय संख्या
तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या पाहणीमध्ये ९,६१८ खातेदार मृत आढळून आले आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक १६९८, भातकुली १६०१, धारणी १०४१, चांदूरबाजार २६६, दर्यापूर ८४६, अमरावती ७१५, अंजनगाव ७८६, अचलपूर ६६२, धामणगाव ३६३, नांदगाव ३०६, चांदूर रेल्वेचे २०६, तिवसा २४६, वरुड १२१ व मोर्शी तालुक्यात ६२ खातेदार मृत असाल्याचे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे.
अमरावती जिल्हाची स्थिती
मृत खातेदार संख्या | ९६१८ |
वारस ठराव निर्णय | १६५९ |
वारस फेरफार दाखल | १२७२ |
वारस नोंद अर्ज | ४७६ |
वारस फेरफार मंजूर | ६३१ |
जिल्ह्यात फेरफारची प्रक्रिया गतिमान
या कालबद्ध मोहिमेसाठी तहसीलदार त्यांच्या तालुक्यासाठी समन्वय अधिकारी, तर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार नियंत्रण अधिकारी आहेत. जिल्ह्यात फेरफार नोंदीचे काम प्रगतीत असल्याने मोहिमेची प्रक्रिया सुलभरित्या होत असल्याचे वास्तव आहे.
वारसांना मिळणार जमिनीचे मालकी हक्क
वारस नोंदीसाठी दिरंगाई होत असल्याने मृत शेतकऱ्यांच्या नावे जमिनी व सातबारा राहतो. परिणामी, वारसांना मालकी हक्क मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकरणात जिवंत सातबारा मोहीम उपलब्धी ठरणारी असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: विदर्भावर सूर्यदेवाचा प्रकोप कायम; वाचा सविस्तर