Join us

पीक विम्यासाठी ३१ जुलैची मुदत, १४ पिकांना मिळणार संरक्षण

By नितीन चौधरी | Published: July 07, 2023 2:01 PM

योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. यंदापासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी ३१ जुलै या मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे. कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छूक नसल्यास तसे विहित मुदतीत बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय विमा कंपनीनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.

परभणी, वर्धा, नागपूर: आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.जालना, गोंदिया, कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.

नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम.एस. जनरल इं. कंपनी लि.

वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार, बीड : भारतीय कृषि विमा कंपनीहिंगोली, अकोला, धुळे, पुणे, उस्मानाबाद : एचडीएफसी जनरल इन्शुरन्स.कं.लि.

यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्सलातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स

योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास तालुका संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तालुका कृषि अधिकारी, नजिकची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा,सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

टॅग्स :पीक विमाखरीपशेती