Join us

Ranbhaji : रानभाजी महोत्सवाची संकल्पना मांडणाऱ्या डॉ. प्रीती हिरळकर रानभाजीबद्दल काय सांगतात... वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 5:22 PM

Ranbhaji : रानभाज्या महोत्सवाची ही अनोखी संकल्पना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. प्रीती हिरळकर यांनी गडचिरोलीत पहिल्यांदा मांडली होती. त्यांच्याशी 'लोकमत'ने साधलेला संवाद

Agriculture News : पावसाळ्यात तरारून उगवणाऱ्या चवदार व औषधी गुणधर्मानी समृद्ध रानभाज्यांचा गडचिरोलीत पहिला महोत्सव झाला होता. तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांना हा महोत्सव खूपच आवडला. त्यानंतर आदेश काढून संपूर्ण राज्यातच महोत्सव आयोजनाची मोहीम सुरु करण्यात आली. रानभाज्या महोत्सवाची ही अनोखी संकल्पना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. प्रीती हिरळकर यांनी गडचिरोलीत पहिल्यांदा मांडली होती. त्यांच्याशी 'लोकमत'ने साधलेला संवाद

चंद्रपूर जिल्ह्याची पर्यावरणीय स्थिती रानभाज्यांना पोषक आहे ? - जिल्ह्याचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. येथील जैवविविधता पर्यावरणाच्या दृष्टीने तर उपयुक्त आहेच. मात्र, मानवी जीवनालाही निरोगी बनविण्याचे सामर्थ्य त्यात आहे. जिल्ह्यातील पर्यावरण स्थितीचा विचार केल्यास अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवण्यास येथील हवामान फार पोषक आहे. मानवी आरोग्याला ज्या सकस अन्नाची गरज लागते, ते अन्नघटक पुरविण्याची क्षमता येथील रानभाज्यांमध्ये आहे.

जिल्ह्यातील किती प्रकारच्या रानभाज्या आढळतात?- साधारणपणे रानभाज्या व शेतभाज्या असे भाज्यांचे दोन प्रकार आहेत. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या व मशागत न करता उगवतात त्यांना 'रानभाज्या म्हणतात. ज्या भाज्या शेतमळ्यात पिकतात, त्यांना 'शेतभाज्या' म्हणतात. जिल्ह्यात ५५ रानभाज्या आढळतात. प्रत्येक रानभाजीत औषधी गुणधर्म आहेत. करटोली, दिंडा, टाकळा (तरोटा), कुडा, आंबुशी, पाथरी (पातूर), शेवगा, अळू, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चांबू, खापरफुटी, कुरड्डू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, अंबाडी, मटारू, पिंपळ, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर, गुळवेल, मायाळू, तांदूळजा, कडूभाजी, बहावा, यासारख्या अनेक रानभाज्या चंद्रपूर जिल्ह्याच्या जंगलात पावसाळ्यात विपूल प्रमाणात आढळतात. महोत्सवाच्या निमित्ताने कृषी विभागाने एक पुस्तिका प्रकाशित केली, त्यात रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मासोबत पाककला, साहित्य व कृतीची माहितीही दिली. ती सर्वांनी वाचावी. आपल्या दैनंदिन आहारात रानभाज्यांचा वापर करावा.

यंदाच्या रानभाज्या महोत्सवात कोणत्या बाबींना फोकस करण्यात आला?- रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्याने लोकांना इच्छा असूनही त्या विकत घेता नाहीत, रानभाज्यांबाबत वन क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना अचूक माहिती असते, ते दरवर्षी धोका पत्करून रानभाज्यांचे संकलन करतात. शहरातील लोकांना विकत घेता यावे, यासाठी हा रानभाजी महोत्सव आयोजित केला जातो. रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यात खते व कीटकनाशके नसतात. अलिकडे विविध आजारांचे प्रमाण प्रचंड वाढले. याला कारण चुकीचा आहार होय.

हिरव्या भाज्या, रानभाज्या व रानफळे आरोग्यवर्धक असतात. आजारांवर मात करण्यासाठी रानभाज्या उपयुक्त ठरतात. हा संदेश लोकांना पटवून देण्याचे कार्य महोत्सवातून करण्यात आले. रानभाज्या संकलन करणारे सुमारे १५० स्थानिक कृषी विभागाच्या संपर्कात आहेत. पण, सध्या तरी संकलनकर्त्यांसाठी योजना नाही.

रानभाज्या वापरताना काय काळजी घेतली पाहिजे ?रानभाज्यांची शास्त्रीय नावे कठीण आहेत. पण, स्थानिक नागरिकांना उत्तम माहिती असते. कोणती भाजी कुठे आढळते, औषधी गुणधर्म कोणते, याबाबत स्थानिक नागरिक, शेतकरी व महिलांना चांगले कळते. रानभाज्यांची स्थानिक नावे कोणती, याविषयीचे त्यांचे ज्ञान फरफेक्ट असते. कृषी विभागाकडूनही नव्या शोध-संशोधनाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविली जाते. त्यामुळे रानभाज्या शक्यतो स्थानिकांकडून घ्याव्यात. त्या स्वच्छ धुव्याव्यात. प्रसंगी उकडाव्यात. शक्यतो तो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यास त्या आरोग्यासाठी हमखास पोषक ठरतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीगडचिरोलीचंद्रपूर