Agriculture News : एकीकडे शेतकऱ्यांच्या सिंचन सोयीसाठी सरकारकडून सिंचन विहीर योजना (Sinchan Vihir Yojana) राबविण्यात येते. यातून अनेक शेतकऱ्यांना पाण्याची चांगली सुविधा उपलब्ध होते. मात्र अशातच सिंचन विहीर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana District) घडल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एकसुद्धा विहीर मंजूर न झालेल्या भोरसा-भोरसी, तेल्हारा, पेठ, आमखेड, गोदरी, पांढरदेव यासह दिवठाणा व इतर गावांतील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सिंचन विहीर (Sinchan Vihir) मंजुरीसाठी होत असलेली आर्थिक लूट, पिळवणूक व गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबात माहिती दिली होती.
सुरुवातीला या याेजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून ६० हजार रुपयांच्या लुबाडणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यापश्चात आता पात्र शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम डावलून केवळ याेजनेत पात्र ठरण्यासाठी पैसे दिलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांवरच कारवाई करण्याचा प्रकार घडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारादेखील दिला आहे.
अधिकाऱ्यांना आश्वासनांचा विसर
शेतकऱ्यांचे रखडलेले सिंचन विहीर व गोठ्यांच्या प्रस्तावांना मंजुरात देऊन काम सुरू करण्यास शेतकऱ्यांच्या लुटीची चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी चिखली तहसीलसमोर पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदाेलनादरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली हाेती. मात्र, त्या आश्वासनांचाही विसर संबंधित अधिकाऱ्यास पडल्याचे दिसते. त्यातही असे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.